जागतिक आर्थिक अस्थिरतेवर सीईओ पिचाई यांचे सुतोवाच
वृत्तसंस्था /सॅन फ्रान्सिस्को
मागील दोन तीन वर्षांपासून निर्माण झालेल्या जागतिक पातळीवरील परिस्थितीमुळे विविध कंपन्या विविध समस्यांचा सामना करत असल्याचे दिसून येत आहे.
जागतिक मंदीचे वातावरण, महागाईचे सावट सध्या सर्वच देशांमध्ये दिसते आहे. याचाच प्रभाव म्हणून आता गुगल कंपनी नोकर भरतीचे प्रमाण काहीसे कमी करणार असल्याचे समजते. गुगलची सहयोगी कंपनी अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी कर्मचाऱयांना पत्र लिहून या संदर्भात माहिती दिली आहे. पिचाई यांनी म्हटले आहे, की कंपनी भरती प्रक्रिया काही प्रमाणात संथ ठेवणार आहे. वर्ष 2022 ते 2023 मध्ये कंपनीचे ध्येय हे फक्त इंजिनिअर्स, टेक्नॉलॉजी ऍनालिस्ट आदी पदांसाठी नोकर भरती करण्यावर केंद्रीत करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
वर्ष 2022 मध्ये पहिल्या भागामधील कंपनीने कर्मचारी भरतीचा कोटा पूर्ण केला आहे. पिचाईने लिहिलेल्या पत्रात, अन्य कंपन्यांप्रमाणेच आर्थिक स्थितीचा परिणाम आपल्या कंपनीवर होणार असल्याचे संकेत व्यक्त केले आहेत. दुसऱया तिमाहीत आम्ही गुगलमध्ये 10,000 कर्मचारी घेतले आहेत. चालू वर्षातील भरती प्रक्रिया पूर्ण केली असून आता राहिलेल्या कालावधीतही ही काहीशी संथपणे ठेवणार असल्याची माहिती आहे.
आर्थिक अस्थिरतेचा गुगलवरही प्रभाव
सुंदर पिचाई यांनी पाठवलेल्या ईमेलच्या आधारे पाहिल्यास अन्य कंपन्यांप्रमाणे आम्हीपण आर्थिक अस्थिरतेचा सामना करत आहोत. जागतिक पातळीवर अनिश्चित आर्थिक स्थिती निर्माण झाल्याने आम्ही अनेक समस्यांना तोंड देत आलो आहोत मात्र सध्याची स्थिती जरा चिंताजनक आहे. वर्तमान काळात आम्ही धोरण बदलण्यावर भर देणार असल्याचेही पिचाई यांनी स्पष्ट केले आहे.
या क्षेत्रात होणार भरती
सीईओ पिचाई यांनी म्हटले आहे, की आम्ही वर्ष 2022-2023 मध्ये इंजिनिअर्स, टेक्निकल आणि अन्य आवश्यक सेवांसाठी कर्मचारी भरती करण्यावर लक्ष्य केंद्रीत करणार आहोत.