ऑनलाईन टीम/तरुण भारत
शिंदे सरकारनं दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांची सुरक्षेत कपात (Security) केली तर काहींची सुरक्षा काढून घेतली. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच सरकारने शिंदे गटातील १० खासदार आणि ४१ आमदारांना आता वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Ddevendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता (Amruta Fadnavis) फडणवीस यांच्याही सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. त्यामुळे आता यावरुन नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हं आहेत.
महत्त्वाचं म्हणजे, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने याआधी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, नाना पटोले, जयंत पाटील, सतेज पाटील, संजय राऊत, विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, भास्कर जाधव, यांच्या नावांचा समावेश होता.
त्याचबरोबर नवाब मलिक, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, सुनील केदार, खासदार डेलकर परिवार, वरुण सरदेसाई. यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली होती. यामधून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शरद पवार यांना वगळण्यात आलं होतं.
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिली जाणारी झेड प्लस दर्जाची सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे. तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा तेजस आणि एकनाथ शिंदेचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाय प्लस सुरक्षेत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. अमृता फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, यापुढे एक्स दर्जाची सुरक्षा मिळणार आहे. याआधी त्यांना वाय प्लस सुरक्षा दिली जात होती.