ग्रामस्थ-विद्यार्थ्यांचे केएसआरटीसी अधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
खानापूर तालुक्मयातील दुर्गम भागात असलेल्या बैलूर आणि इतर गावांना बसची सोय नसल्यामुळे मोठी समस्या निर्माण होत आहे. बेळगावला येणे अवघड जात असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. नियमित बस सोडावी या मागणीसाठी बैलूर आणि परिसरातील विद्यार्थ्यांनी केएसआरटीसीचे विभागीय नियंत्रण अधिकारी के. के. लमाणी यांना निवेदन दिले.
खानापूर तालुक्मयामध्ये अनेक गावे विविध योजनांपासून वंचित आहेत. बसची सोय नसल्यामुळे मोठी समस्या होत आहे. केवळ तोराळी गावाला बस आहे. मात्र इतर गावांना स्वतंत्र बससेवाच नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना शहराकडे येणे अवघड झाले आहे. बैलूर परिसरातील विविध गावांमधील 200 हून अधिक विद्यार्थी बेळगावला शिक्षणासाठी येतात. त्यासाठी तातडीने बस बस सुरू करा, अशी मागणी करण्यात आली.
लोकसंख्येच्या मानाने बसेस सोडणे गरजेचे
बैलूरसह इतर गावांचा विस्तार वाढत चालला आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या मानाने बस सोडणे नितांत गरजेचे आहे. या रस्त्यावर अनेक गावे आहेत. त्यामुळे प्रवाशांची संख्याही अधिक आहे. त्यासाठी अधिकाधिक बस सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी गांभीर्याने विचार करावा आणि बससेवा सुरू करावी, असे या निवेदनात म्हटले आहे.
केएसआरटीसीचे विभागीय नियंत्रणाधिकारी के. के. लमाणी यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी ग्राम पंचायत सदस्य विठ्ठल नाकाडी, रमाकांत कोंडुसकर, रविंद्र गुरव, कुशाण्णा गुरव, लक्ष्मण झांजरे, पवन गुरव, तुकाराम बिर्जे, संजय गुरव यांच्यासह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.