बाळासाहेब उबाळे- कोल्हापूर
व्यापारी-उद्योजकांतून कोल्हापूर-मुंबई विमानसेवेला मागणी असली तरी काही कारणांनी ही विमानसेवा दोन वर्षे बंद होती. या मार्गावरील विमानसेवेतील अडचणी आणि अडथळे दूर करुन पुन्हा स्टार एअरवेजकडून उडाणाला सुरुवात झाली आहे. या विमानसेवेचे प्रवाशातून स्वागत होत आहे. पण ही सेवा पुन्हा खंडित न होता त्यामध्ये नियमितता ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
व्यापार- उद्योग, पर्यटनाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हा हा महत्वपूर्ण आहे. येथील शेतमालासह अनेक वस्तूंची मोठय़ा प्रमाणात निर्यात होते. इतर राज्यातील उद्योजक, व्यापारी कोल्हापूरला भेट देतात. सकाळी कोल्हापुरात येऊन त्यांना परत आपल्या घरी परतायचे असते. पण विमानसेवा नसल्याने व्यापारी- उद्योजकांसमोर वेळेची अडचण निर्माण होते.
सद्या कोल्हापूर विमानतळाच्या विकासाचे काम प्रगतीपथावर आहे. नाईट लँडिंगचे काम पूर्ण झाल्याने नोव्हेंबरपासून रात्रीच्या वेळी सुध्दा कोल्हापूर विमानतळावरुन विमानाचे उडाण होणार आहे. तसेच नवीन टर्मिनल इमारतीचे काम सुरु असून ते मार्च 2023 पर्यंत पूर्ण होणार आहे. धावपटीचीही विस्तार झाला आहे. कोल्हापूर विमानतळावरुन सद्यस्थितीत हैदराबाद, तिरुपती आणि अहमदाबाद अशी विमानसेवा सुरु आहे. पण दोन वर्षापासून कोल्हापूर- मुंबई या महत्वाच्या मार्गावरील विमानसेवा बंद होती. यापूर्वी उडाण योजनेतून मुंबईसाठी विमानसेवा सुरु करण्यात आली होती. पण नंतर त्यामध्ये नियमितता राहिली नाही. तांत्रिक कारणामुळे तसेच मुंबईत सकाळचा स्लॉट मिळत नसल्याच्या कारणावरुन वेळोवेळी विमान कंपनीकडून सेवा खंडित केली जात होती. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. त्यानंतर सद्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय पाटील, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार सतेज पाटील यांनी केंद्रीय नागरी विमान उडाणमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करुन मुंबईसाठी ट्रू जेट या कंपनीची विमानसेवा सुरु झाली. पण नंतर त्या कंपनीकडूनही विमान उडाण बंद झाले. यामुळे प्रवाशांतून नाराजी व्यक्त करण्यात आली.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात केंद्रीय नागरी विमान उडाण मंत्री ज्योतिरादित्य सिंदीया यांनी कोल्हापूरला भेट दिली. त्यावेळी विमानतळावरील विकासकामांची माहिती घेऊन बंद असलेली कोल्हापूर- मुंबई विमानसेवा पुन्हा सुरु करण्याची ग्वाही दिली होती. त्याप्रमाणे 4 ऑक्टोबरपासून कोल्हापूर- मुंबई या मार्गावर पुन्हा विमानसेवा सुरु झाली आहे. या विमानसेवेचे व्यापारी- उद्योजकांतून स्वागत करण्यात आले आहे. पण पुन्हा ही सेवा खंडित होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आठवडय़ातील सात दिवस सेवा सुरु राहावी
कोल्हापूर मुंबई मार्गावर यापूर्वीही विमानसेवा सुरु होती. पण काही कारणांनी त्यामध्ये अनियमितता राहिली. नंतर ही सेवा खंडितही झाली. सद्या स्टार एअरवेजने कोल्हापूर-मुंबई मार्गावर विमानसेवा सुरु केली असून व्यापारी- उद्योगपतींनी या विमानसेवेचे स्वागत केले आहे. प्रवाशांचा प्रतिसादही मोठा आहे. विमान रोज हाऊसफुल्ल आहे. यामुळे आठवडय़ातील सर्व दिवस कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरु करण्याची गरज आहे.
बी.व्ही. वराडे-अध्यक्ष ट्रव्हल्स एजंट असोसिएशन