साहायक स्टाफमधील ग्रेग क्लार्क व मिचेल डेव्हिड पेम्बर्टन यांच्याकडूनही पदत्याग
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या पुरुष हॉकी संघाचे प्रमुख प्रशिक्षक ग्रॅहॅम रीड यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. नुकत्याच झालेल्या एफआयएच विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघाची निराशाजनक कामगिरी झाली. त्यात भारताला संयुक्त नववे स्थान मिळाले. याची जबाबदारी स्वीकारत रीड यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्याप्रमाणे विश्लेषणात्मक प्रशिक्षक ग्रेग क्लार्क व सायंटिफिक सल्लागार मिचेल डेव्हिड पेम्बर्टन यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
एप्रिल 2019 मध्ये रीड यांची प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने 2021 मध्ये झालेल्या टोकिओ ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले होते. ऑस्ट्रेलियाच्या 58 वर्षीय रीड यांनी आपला राजीनामा हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांच्याकडे भुवनेश्वरमधील विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर दुसऱया दिवशी सोपविला आहे. या स्पर्धेत जर्मनीने विद्यमान विजेत्या बेल्जियमचा पराभव करून तिसऱयांदा जेतेपद पटकावले. ‘मी बाजूला होऊन नव्या व्यवस्थापनाकडे ही जबाबदारी सोपविण्याची वेळ झाली आहे,’ असे रीड म्हणाले. पुढील वर्षी होणाऱया पॅरिस ऑलिम्पिकपर्यंत त्यांचा कार्यकाल होता. ‘भारतीय संघ व हॉकी इंडियासोबत काम करणे हा माझा सन्मान व विशेषाधिकर आहे. या प्रवासातील प्रत्येक क्षणाचा मी पुरेपूर आनंद लुटला. भावी वाटचालीसाठी या संघाला माझ्या मनापासून शुभेच्छा,’ असेही रीड म्हणाले.
हॉकी इंडियाचे अध्यक्ष तिर्की व सरचिटणीस भोलानाथ सिंग यांनी खेळाडू व सपोर्ट स्टाफची भेट घेऊन संघाची कामगिरी व भविष्यातील धोरण याबाबत सविसतर चर्चा केल्यानंतर रीड यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. रीड यांच्याप्रमाणे विश्लेषणात्मक प्रशिक्षक गेग क्लार्क व सायंटिफिक सल्लागार मिचेल डेव्हिड पेम्बर्टन यांनीही सोमवारी सकाळी आपले राजीनामे हॉकी इंडियाकडे सोपविले. एक महिन्याच्या नोटिस कालावधीनंतर ते पदमुक्त होतील.
रीड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने मोठे यश मिळविले. 41 वर्षानंतर भारताला ऑलिम्पिक पदक मिळविता आले तर गेल्या वर्षी बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य मिळविले. याशिवाय एफआयएच प्रो लीग 2021-22 या मोसमात भारताने तिसरे स्थान मिळविले. रीड यांच्या मार्गदर्शनाखाली मिळविलेल्या यशात 2019 मध्ये एफआयएच सिरीज फायनलमध्ये मिळविलेल्या जेतेपदाचाही समावेश आहे. त्याच वर्षी भुवनेश्वरमधील पात्रता स्पर्धा जिंकून भारताने टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळविली होती.
या त्रिकुटाचा राजीनामा तिर्की यांनी स्वीकारला असून त्यांच्या सेवेबद्दल देश त्यांचा सदैव ऋणी राहील, असे त्यांनी सांगितले. ‘रीड व त्यांचा सहाय्यक स्टाफ यांचा भारत सदैव कृतज्ञ राहील. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने उत्तम यश मिळविले, विशेषतः ऑलिम्पिक स्पर्धेत. प्रत्येक प्रवास वेगळय़ा टप्प्यातून वाटचाल करीत असतो. त्यानुसार आम्हालाही आता पुढे वाटचाल करावी लागणार असून संघासाठी नवा दृष्टिकोन अवलंबावा लागणार आहे,’ असेही ते म्हणाले.
विश्वचषक स्पर्धेची सुरुवात करताना भारतीय संघ क्रमवारीत पाचव्या स्थानावर होता. पण उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात त्यांना अपयश आले. क्रॉसओव्हर लढतीत भारताला पेनल्टी शूटआऊटमध्ये न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. क्लासिफिकेशन सामन्यात जपानचा 8-0 व दक्षिण आफ्रिकेचा 5-2 असा पराभव करून यजमान संघाला अखेर अर्जेन्टिनासमवेत संयुक्त नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले.