मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे. जगात माणूस एकटय़ाने काही साध्य करू शकत नाही. माणसांचा सहवास, त्यांची साथ आणि लहानपणापासून झालेले संस्कार, या सगळय़ा गोष्टींचा माणसाच्या आयुष्यावर खूप प्रभाव असतो. एखाद्या माणसाच्या स्वभावावरून, सवयींवरून, त्याच्या दुसऱयांशी वागण्याच्या पद्धतीवरून आपण त्या व्यक्तीबद्दल बरेच काही जाणून घेऊ शकतो. अशावेळेला लहानपणापासून जर माणसाला चांगल्या, कर्तृत्ववान, सुसंस्कृत लोकांची साथ मिळाली तर याचा उपयोग त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासात होऊ शकतो. पूर्वी एकत्र कुटुंबं असायची किंवा अनेक कुटुंबं एका वाडय़ात गुण्या गोविंदाने रहात असत, त्यामुळे लहानपणापासूनच मुले-मुली वेगवेगळय़ा लोकांच्या सहवासात यायचे. यामुळे नवनवीन गोष्टी ऐकायला मिळायच्या, अनुभव कळायचे आणि छंद कळायचे. वेगवेगळय़ा वयाचे लोक घरात असले की जगाचा एक समग्र दृष्टिकोन मुलांना मिळतो. पण आजच्या त्रिकोणी कुटुंबांमध्ये जिकडे आई-वडील दोघेही आपल्या जबाबदाऱया पार पाडण्यात व्यस्त असतात तिकडे मुलांना माणसांचा सहवास कमी मिळतो. लहानपणापासून कुटुंबाशिवाय एकटे राहायची सवय होऊ लागते आणि मग कुटुंबापेक्षा बाहेरचे जग जास्ती हवेहवेसे वाटू लागते. ही अलिप्तता प्रवृत्ती व्यक्तीच्या इतर सर्व नातेसंबंधांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.
एखाद्या कुटुंबात हा मायेचा, संस्काराचा अभाव फक्त आजी आजोबाच भरून काढू शकतात. प्रत्येक मुलाला लहानपणी तरी आजी आजोबांचा किंवा घरातील वरि÷ांचा सहवास मिळायला हवा. असे आजी आजोबा, जे नातवंडांवर बिनशर्त प्रेम करतील, त्यांना गोष्टी सांगतील, आईवडील ओरडले की लाड करतील. आजी-आजोबा हे कुटुंबातील सर्वात महत्त्वाचा भाग आहेत. आपल्या भावी पिढीला स्वतःच्या डोळय़ांसमोर घडवणे आणि विकसित होताना पाहणे हा त्यांचा एक अद्भूत अनुभव आहे. त्यांच्याकडे अनुभवाचा आणि गोष्टींचा खजिना असल्याने नातवंडांना शिकवण्यासारखे भरपूर काही असते. असे म्हणतात की कोणतेही लहान मुले, महागडय़ा खेळण्यांपेक्षा किंवा मोठमोठय़ा यशापेक्षा, छोटय़ा छोटय़ा पण मौल्यवान आठवणी जास्त जपतात.
माणसाची ओळख त्याच्या वंशावळी आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीमुळे होते. जेव्हा आजी-आजोबा रात्री झोपायच्याआधी आपल्या नातवंडांना विविध काळातल्या पौराणिक आणि काल्पनिक गोष्टी सांगत असतात तेव्हा ते गोष्टींबरोबर सांस्कृतिक इतिहासातील काही अंश त्या चिमुकल्या मनामध्ये सोडत असतात. त्याचबरोबर, त्यांनी लावलेली शिस्त, पूर्वजांच्या सांगितलेल्या गोष्टी, पूर्वापार चालत आलेले चमचमीत पदार्थ आठवले की मन भरून येते. कित्येकदा आजही घरात पसारा वाढला की आजीचे कडक पण काळजीने ओरडलेले शब्द आठवतात. नकळत आपण सवयीनुसार कित्येक गोष्टी करतो ज्याचे थेट नाते आपल्या आजी-आजोबांच्या संस्कारांशी असते.
एवढेच नव्हे तर विविध वयाच्या, विविध स्वभावाच्या लोकांबरोबर वाढलो तर आपण एक समयोचित वृत्ती विकसित करू शकतो जी प्रौढत्वात जगात पदार्पण केल्यावर आपल्याला उपयोगी ठरते. सध्याची सामाजिक परिस्थिती आणि मागील काही वर्षात कुटुंब व्यवस्थेमध्ये झालेले बदल या दोन्ही गोष्टींचा जर अभ्यास केला तर आत्ताच्या तरुण पिढीबद्दल बरेच काही समजू शकते.
आजची तरुण पिढी अधिक स्वतंत्र आणि अंतर्मुखी झाली आहे. एकत्र कुटुंबांची रचना जशी विरघळू लागली, तसाच मनुष्य अधिक स्वतंत्र विचारांचा होत चालला आहे. विकासाच्या दृष्टीने ते जरी आवश्यक असले तरी त्याचबरोबर आपल्या संस्कृतीचे जतन करणेदेखील महत्त्वाचे आहे. मानवजातीचे अस्तित्व त्याच्या इतिहासावर आधारित आहे. इतिहासाशिवाय माणूस काहीच नसतो. आपल्या आजी-आजोबांची आणि त्यांच्या वंशपरंपरेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे कारण ते आपल्या सांस्कृतिक इतिहासाचे प्रतिनिधी आहेत. असे म्हणतात की घरातील वरि÷ांची सेवा केली, त्यांची काळजी घेतली की पुण्य मिळते. खरंतर हे पुण्य म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून, आशीर्वादाच्या रूपात मिळालेले त्यांचे संस्कारच असतात. बरेचदा माणसाला आपल्या आजूबाजूच्या माणसाची किंमत ते नसतानाच कळते. अधिक महत्त्वाचे म्हणजे आपण बरेचदा आपल्या कुटुंबीयांना आणि त्यातील वरि÷ाना गृहीत धरतो. त्यांचे घरात असणे अडचणदेखील वाटू लागते. दोन पिढींमध्ये नेहमीच अंतर असणार आहे आणि अंतर असणे हे विकासाचे लक्षण आहे. घरातील वृद्ध बरेचदा शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा थकलेले असतात. आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी कष्ट आणि त्याग केलेली ही पिढी आता बदलत्या पिढीबरोबर चालू पाहत असते. अशावेळेला त्यांचा तिरस्कार करून त्यांना अडचण समजण्यापेक्षा, त्यांच्या कष्टाची आणि त्यागाची जाणीव ठेवली पाहिजे. ते थकले आहेत हे समजून पुढील तरुण पिढीने त्यांची जबाबदारी आपणहून स्वीकारली पाहिजे. त्यांच्या तारुण्यातदेखील त्यांना अनेक नवनवीन गोष्टी करायची इच्छा असूनसुद्धा ते जबाबदाऱयांमुळे करू शकले नाहीत. आणि म्हणूनच आज आपण एवढा विकास वैयक्तिक आणि जागतिक स्तरावर अनुभवतो आहोत. फक्त घरातील वृद्ध लोकांकडे नाही, तर घरातील सर्व कुटुंबीयांकडे एका नवीन समावेशक दृष्टिकोनाने बघितले पाहिजे. पुन्हा एकदा कुटुंबीयांमध्ये संवाद साधला पाहिजे. आपल्या आजी-आजोबांबरोबर सहज कधीतरी गप्पागोष्टी केल्या पाहिजेत. त्यांच्या जुन्या आठवणी जाणून घेऊन आपल्या इच्छा आकांक्षा त्यांच्यापुढे व्यक्त केल्या पाहिजेत. जर तुमचे आजी आजोबा तुमच्याबरोबर वेळ घालवायचा प्रयत्न करत असतील, तर त्यांना थांबवू नका. जर ते तुमच्या वैयक्तिक जीवनात अडचण आणत आहेत असे तुम्हाला वाटत असेल तर त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधा. त्यांना तुमच्या मनातील व्यथा सांगा आणि जर तुमचे आजी-आजोबा तुमच्यापासून लांब राहत असतील तर स्वतःहून वेळ मिळेल तसे त्यांना भेटायला जा किंवा फोन वर दिवसाच्या घडामोडी सांगा. म्हणतात ना नंतर दुःख करण्यापेक्षा वेळेत दुरुस्त करणे कधीही चांगले आहे. त्यामुळे आजी आजोबांच्या रूपातील या इतिहासाच्या आणि संस्कृतीच्या खजिन्याला हरवून देऊ नका. काय माहीत पुढे जाऊन खूप गरज भासत असतानाही हक्काने कोणी ओरडायला, गोष्टी सांगायला आणि खाऊ घालायला नसले तर? -श्राव्या माधव कुलकर्णी