मुख्यमंत्री बोम्माई यांचे आश्वासन : गृहनिर्माण योजनेतील 5 लाख घरांची कामे अंतिम टप्प्यात
बेंगळूर : गरिबांना जमीन खरेदी आणि घरे बांधण्यास अनुकूल व्हावे याकरिता सध्या असणाऱ्या कायद्यात शिथिलता आणण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिले आहे. बेंगळूरच्या यलहंका तालुक्यातील अग्रहारपाळ्या येथे 1 लाख बहुमजली वसती योजनेच्या घरांचे लोकार्पण आणि हस्तांतरण केल्यानंतर ते बोलत होते. महसूल कायद्यात विशिष्ट प्रमाणात सवलती नाहीत. जमिनींच्या किमती वाढण्यास मागणीत झालेली वाढच कारणीभूत आहे. सध्या अस्तित्वात असणाऱ्या कायद्यांमुळे गरिबांना जमिनी खरेदी करणे कठीण आहे. त्यामुळे त्यांना जागा खरेदी करून घरे बांधण्याची संधी मिळेल, अशा पद्धतीने कायद्यात दुरुस्ती करून नियम शिथिल केले जातील, असे ते म्हणाले.
आपण आणि आपले कुटुंब एकाच छताखाली स्वाभिनानाने जगावे, अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. गरिबांना छोटेसे घर बांधण्यासाठी सहकार्य करण्याचे काम मोठ्या प्रमाणात होण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकारने ठोस उपाययोजना केल्या आहेत. सहा वर्षांपूर्वी तत्कालिन सरकारने 15 लाख घरे बांधण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यासाठी अनुदानाची तरतूद केली नव्हती. 15 हजार कोटी रु. अनुदानाची गरज असताना 3 हजार कोटी रु. राखून ठेवण्यात आले होते. या अनुदानातून पुरेशा प्रमाणात घरे बांधणे शक्य झाले नव्हते. आपल्या पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर 10 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले होते. त्यापैकी 5 लाख घरांची कामे अंतिम टप्प्यात आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री बोम्माई यांनी दिली.