चेन्नईत पोहोचलेल्या मच्छिमारांनी केंद्राचे मानले आभार
वृत्तसंस्था/ चेन्नई
श्रीलंकेच्या तुरुंगातून मुक्तता झालेले 15 मच्छिमार मंगळवारी चेन्नईच्या विमानतळावर पोहोचले. श्रीलंकेच्या नौदलाने 18 नोव्हेंबर रोजी 22 मच्छिमारांसमवेत दोन नौकांना ताब्यात घेतले होते. या घटनेनंतर पारंपरिक मच्छिमारांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेत मच्छिमारांच्या मुक्ततेसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले होते. तामिळनाडूच्या रामेश्वरम येथील रहिवासी असलेल्या या मच्छिमारांना श्रीलंकेच्या नौदलाने ताब्यात घेतले होते.
सीतारामन यांनी विदेशसचिव आणि श्रीलंकेतील भारतीय राजदूताशी संपर्क साधला होता. यानंतरच मच्छिमारांची मुक्तता होऊ शकली आहे. मच्छिमार भारतात परतताच त्यांच्या एका शिष्टमंडळाने सीतारामन यांचे आभार मानले आहेत. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने नेहमीच तमिळांच्या हितांना सर्वोच्च प्राथमिकता दिल्याचे सीतारामन यांनी सांगितले आहे.
यापूर्वी 29 ऑक्टोबर रोजी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी विदेशमंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहून श्रीलंकेच्या नौदलाकडून तामिळनाडूच्या मच्छिमारांच्या विरोधात होणाऱ्या वारंवार कारवाईकडे लक्ष वेधले होते. आमचे मच्छिमार उपजीविकेसाठी पूर्णपणे मासेमारीवर अवलंबून आहेत. अशा स्थितीत त्यांना सातत्याने ताब्यात घेतले जात असल्याने मोठा त्रास सहन करावा लागतोय. श्रीलंकेच्या नौदलामुळे मच्छिमार समुदायामध्ये दहशत निर्माण झाली असल्याचे स्टॅलिन यांनी पत्रात नमूद केले होते.
स्टॅलिन यांनी सामुद्रधुनी क्षेत्रात मच्छिमारांच्या मासेमारीच्या अधिकाराचे रक्षण करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला होता. केवळ ऑक्टोबर महिन्यात श्रीलंकेच्या नौदलाने 10 नौका आणि 64 मच्छिमारांना ताब्यात घेतले असल्याचे स्टॅलिन यांनी म्हटले आहे.