समभागातील मजबूत स्थितीमुळे कंपनीकडून विक्रमी टप्पा प्राप्त
नवी दिल्ली
रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड (आरआयएल) चे समभाग बुधवारी प्राप्त झालेल्या तेजीमुळे कंपनीचे बाजार मूल्य वधारुन 19 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झाल्याची नोंद करण्यात आली आहे. बाजारमूल्यचा हा टप्पा प्राप्त करणारी रिलायन्स ही पहिली भारतीय कंपनी ठरली आहे.
भारतीय शेअर बाजारात रिलायन्सचे समभाग 1.85 टक्क्यांनी वधारुन 2,827.10 रुपयांच्या विक्रमी टप्प्यावर पोहोचले आहेत. समभागातील किमतीच्या तेजीमुळे बीएसईवर सकाळी ट्रेडिंगमध्ये कंपनीचे बाजार मूल्य 19,12,814 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. या अगोदर चालू वर्षातील मार्च महिन्यात रिलायन्सचे बाजारमूल्य 18 लाख कोटी रुपयावर राहिले होते. चालू वर्षात आतापर्यंत रिलायन्सचे समभाग 19 टक्क्यांपेक्षा अधिकने वधारले आहेत.
स्वास्तिक इन्वेस्टमार्ट लिमिटेडचे शोध प्रमुख संतोष मीणा यांच्या माहितीनुसार रिलायन्स इंडस्ट्रिज सर्व विभागात चांगली कामगिरी करत आहे. यामध्ये तेल व गॅसच्या किमती वधारल्याच्या कारणामुळे पेट्रोकेमिकल व्यवसायाला चांगले दिवस आले असल्याचेही यावेळी स्पष्ट केले आहे.