मागील आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहीतील दमदार कामगिरी
वृत्तसंस्था/ मुंबई
रिलायन्स इंडस्ट्रिजने मार्च 2022 ला संपलेल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात 22 टक्के इतकी वाढ नोंदवली आहे. कंपनीने सदर तिमाहीत 16 हजार 203 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला असून यापूर्वीच्या आर्थिक वर्षाच्या संबंधित तिमाहीत 13 हजार 227 कोटीचा नफा मिळवला होता.
कंपनीच्या महसुलात 36 टक्के वाढ होत 2,11,887 कोटी रुपयांवर पोहचला आहे. मागील आर्थिक वर्षात हा आकडा 1 लाख 54 हजार 896 कोटी रुपये इतका होता. आर्थिक वर्ष 2022 मध्ये कंपनीने 7 लाख 92 हजार 756 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला असून 100 अब्ज डॉलर्सच्या महसुलाचा टप्पा ओलांडणारी रिलायन्स ही पहिली भारतीय कंपनी ठरली आहे.
याचदरम्यान कंपनीने लाभांश देण्याचे जाहीर केले आहे. रिलायन्सचे समभाग शुक्रवारी बाजारात 12 रुपयांनी घसरुन 2 हजार 628 रुपयांवर बंद झाला होता.. यावर्षाच्या सुरूवातीपासून पाहता रिलायन्सने 9.32 टक्के इतका गुंतवणूकदारांना परतावा दिला आहे. मागच्या वर्षभराचा विचार केल्यास कंपनीने 36 टक्के परतावा दिला आहे.
रिलायन्सने डिजिटल सेवा आणि रिटेल क्षेत्रात चांगली कामगिरी केल्यानेच नफ्यामध्ये कंपनीला चांगली प्रगती साध्य करता आल्याचे रिलायन्सचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे.