नद्यांची पाणीपातळी वाढतीच : पावसाचे प्रमाण घटले, पण धरणातून विसर्ग सुरूच
वार्ताहर/एकसंबा
पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर जरी कमी झाला असला तरी धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे कृष्णा, दूधगंगा व वेदगंगा नद्यांच्या पाणीपातळीत रविवारी देखील वाढच झाली आहे. तालुक्यातील या प्रमुख नद्या धोका पातळीकडे आगेकूच करत आहेत. दूधगंगा नदी धोका पातळी गाठण्यास केवळ 0.4 मीटर पाणीपातळी कमी आहे. तर कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली असून धोका पातळी गाठण्यास 1.16 मीटर पाणीपातळी कमी आहे. वाढत्या पाणीपातळीमुळे निपाणी, चिकोडी, कागवाड व अथणी तालुक्यातील 829 कुटुंबांचे स्थलांतर केले आहे. तसेच कृष्णा नदीचा 24 तासात 27 हजार 328 क्युसेक इतका पाण्याचा प्रवाह वाढला आहे.
कृष्णा नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे सुक्षेत्र येडूर येथील वीरभद्रेश्वर मंदिरात रात्री 10.30 च्या सुमारास पाणी आले. सकाळपर्यंत मंदिरात जवळपास 3 फूट पाणी वाढले होते. कृष्णा नदीच्या पाणीपातळीत 0.33 मीटर तर दूधगंगा नदीच्या पाणीपातळीत 0.31 मीटरने वाढ झाली आहे. तसेच राजापूर बंधाऱ्यातून 2 लाख 30 हजार 183 क्युसेक पाण्याचा प्रवाह येत आहे. दूधगंगा नदीतून 47 हजार 520 क्युसेक पाण्याचा प्रवाह येत असून कल्लोळ कृष्णा नदीत 2 लाख 77 हजार 703 क्युसेक पाण्याची आवक व जावक होत आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाणीपातळी कमी होईल असा अंदाज व्यक्त करून घरात राहिलेल्या कृष्णा व दूधगंगा काठावरील जवळपास 12 कुटुंबांना रविवारी स्थलांतरित करण्यात आले.
पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असला तरी अधूनमधून येणाऱ्या पावसामुळे पाण्याची आवक होत आहे. यामुळे कोयना धरणातून 32 हजार 100 क्युसेक, कण्हेर धरणातून 3 हजार 848 क्युसेक, वारणा धरणातून 16 हजार 976 क्युसेक, काळम्मावाडी धरणातून 8 हजार 100 क्युसेक तर राधानगरी धरणातून 4 हजार 356 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. आलमट्टी 71.708 टीएमसी पाणीसाठा असून 515.88 मीटर पाणीपातळी आहे. धरणात 2 लाख 54 हजार 829 क्युसेक पाण्याची आवक होत असून 3 लाख 25 हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाणलोट क्षेत्रात 100 ते 250 मि.मी. पडणारा पाऊस 35 ते 110 मि.मी. पडत आहे.