वार्ताहर /धामणे
मागील पंधरा दिवसाच्या उसंतीनंतर पुन्हा दमदार पावसाची सुरुवात झाल्याने देसूर, राजहंसगड, नंदिहळ्ळी, नागेनहट्टी, धामणे, मासगौंडहट्टी या भागातील शेतकऱयांना दिलासा मिळाला आहे. भातपिकाच्या रोपाची लागवड करण्यास सोयीस्कर झाल्यामुळे या भागातील शेतकरी वर्ग या कामात गुंतला आहे.
त्याचप्रमाणे भात पिकातील भांगलणीचे कामही जोरात सुरू आहे. त्यामुळे शेतात काम करणाऱया मजुरांची कमतरता भासत असल्याचे या भागातील शेतकऱयांकडून सांगण्यात आले. कारण या भागातील युवक व पुरुष-महिला शहरी भागात कामासाठी जात आहेत. काही मोजकीच पुरुष मंडळी शेतीच्या कामासाठी असतात. त्यामुळे शेतीच्या कामात महिलांचा सहभाग मोठा आहे.
देसूर, राजहंसगड, धामणे या भागातील भातपिकांच्या रोपलागवडीची कामे जवळजवळ संपत आली असून भांगलणीचे काम सुरू आहे. नंदिहळ्ळी, नागेनहट्टी येथील भाताच्या रोपांच्या लागवडीचे काम जोरात असल्याचे दिसून येत आहे. या भागात भातपेरणीला उशीर झाल्याने आणि त्याचवेळेला पाऊस जास्त प्रमाणात झाल्याने पेरणी केलेले भात खराब झाले.
त्यामुळे भातरोप लागवडीचे प्रमाण वाढल्याने रोपलागवडीला उशीर झाल्याचे येथील शेतकऱयांकडून सांगण्यात आले. आतापर्यंत पाऊस शेतीसाठी समाधानकारक झाला असल्याचेही शेतकऱयांकडून सांगण्यात आले.