ऑनलाईन टीम / तरुण भारत :
बनावट शपथपत्र प्रकरणात ठाकरे गटाला मुंबई क्राईम ब्रँचकडून मोठा दिलासा मिळाला आहे. तीन दिवसांच्या कसून चौकशीनंतर ठाकरे गटाने सादर केलेल्या शपथ पत्रांमध्ये काहीही आक्षेपार्य नसल्याचा खुलासा क्राईम ब्रँचकडून करण्यात आला आहे.
राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देणारी अनेक शपथपत्र बनावट असल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला होता. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावमधील 200 शपथपत्रांवर आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर मुंबईच्या निर्मलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई क्राईम ब्रँचच्या दोन अधिकाऱ्यांचे पथक तीन दिवस कोपरगावमध्ये ठाण मांडून होते. त्यानंतर शिवसैनिकांच्या कथित बनावट प्रतिज्ञापत्रावरील चौकशी पूर्ण झाली आहे. शपथ पत्रांमध्ये काहीही आक्षेपार्ह आढळले नाही, असा खुलासा मुंबई क्राईम ब्रँचचे अधिकारी मधुकर सानप यांनी केला आहे.
अधिक वाचा : परतीचा मान्सून महाराष्ट्रातून लवकरच माघारी
गेले तीन दिवस आम्ही ज्या कार्यकर्त्यांनी प्रतिज्ञापत्र दिले आहेत. त्या प्रत्येकाला समक्ष बोलवून त्यांची विचारपूस केली. त्यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे की नाही, याची खात्री केली. त्यावेळी सर्वांनीच ते शपथपत्र दिलं आहे असं आमच्या जबाबात सांगितल्याचे सानप म्हणाले.