प्रतिनिधी/ बेळगाव
मंगळवारी ऐन दिवाळीत यावर्षातील शेवटचे सूर्यग्रहण झाले. ग्रहणाचा सुतक कालावधी सोमवारी रात्रीपासून सुरू झाला. मंगळवारी 11 वाजून 28 मिनिटांपासून सूर्यग्रहण सुरू झाले आणि सायंकाळी 6 वाजून 33 मिनिटाला संपले. तज्ञांच्या मते भारतात हे ग्रहण 4 वाजून 22 मिनिटांपासून काही ठिकाणी दिसायला सुरुवात झाली आणि 5.26 वाजेपर्यंत त्याचा अमल राहिला.
पृथ्वी, चंद्र यांच्यासह सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात. जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात, तेव्हा सूर्यग्रहण होते. सूर्यग्रहण थेट पाहू नये असा सल्ला तज्ञ देतात. ग्रहणानिमित्त शहरातील विविध मंदिरांत धार्मिक कार्यक्रम झाले. श्रीक्षेत्र दक्षिण काशी येथे विविध धार्मिक कार्यक्रम करून काही काळापुरते मंदिर बंद करण्यात आले. ग्रहणकाल संपल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले झाले. कपिलेश्वर मंदिर आणि बहुसंख्य ठिकाणी ग्रहणामध्ये पाण्यात मुसळ उभे करून ठेवण्यात आले होते. ग्रहण कालामध्ये शुभ गोष्टी करू नयेत, असा संकेत असल्याने ऐन दिवाळीत मंगळवारी बाजारपेठ मात्र सुनी झाली होती.
शिवबसवनगर येथील विज्ञान केंद्रामध्ये सनग्लासचा वापर करून ग्रहण पाहण्यात आले. तेथे अनेक लोकांनीही गर्दी केली होती. येथील एस. जे. नागलोतीमठ विज्ञान केंद्रामध्ये ग्रहण पाहण्यासाठी आलेल्या लोकांना त्याचे वैज्ञानिक महत्त्व पटवून देण्यात येत होते. येथे सूर्यग्रहण पाहण्याची सोय करण्यात आली होती. ढगाळ वातावरण नसल्याने सूर्यग्रहण पाहता आले. सूर्यग्रहणामुळे आहार दूषित होतो, पाणी प्रदूषित होते, या अंधश्रद्धा असूनही केवळ वैज्ञानिक घटना आहे, असे तेथील संचालकांनी सांगितले.