प्रतिनिधी/ सातारा
साताऱयाचे बाईक राईडर संभाजी पवार यांनी जगातल्या अनेक देशात राईडींग केले आहे. त्यांच्या पत्नी सौ. शुभांगी पवार यांचा गतवर्षी दुर्गोत्सवात नांदेड येथील भोकर फाटा येथे बाईक रॅलीदरम्यान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यातून ते सावरत पुन्हा नव्या मोहिमा अन् नवा विक्रम करण्यासाठी संभाजी पवार हे विचार करत राहिले. त्यांनी व त्यांचे मित्र प्रितम जाधव यांनी रविवारी नवा विक्रम केला असून जगातील सर्वात उंचावर असलेला मोटरबाईक रोडवरुन बाईक चालवली आहे. संभाजी पवार यांनी हा विक्रम करत बाईक रॅलीमध्ये अपघातात मयत झालेल्या पत्नी शुभांगी पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला.
साताऱयाचे प्रख्यात रायडर संभाजी पवार आणि प्रीतम जाधव यांनी लडाख मधील भारत-चीन सीमारेषेवरवर असलेली जगातली सर्वांत उंच मोटार बाईक रोड असलेली उमलिंग खिंड सर केली. उनले ते उमलींगला हे अंतर 90 कि. मि. असून या खिंडीकडे जाणारा काही ठिकाणचा रस्ता बॉर्डर रोड ऑर्गनायजेशनने बनवला आहे. सहा महिन्यांपूर्वी नागरिकांसाठी खुला केलेला आहे. या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे मोठी जोखीम असते. या वेळच्या लेह लडाख बाईक प्रवासात उमलिंग खिंड सर करायचीच हा संभाजी पवार यांनी निश्चिय केलेला. उनले या ठिकाणाहून निघाल्यानंतर सुरुवातीचा रस्ता पार केला. त्यानंतर अवघड वळणांचा रस्ता, खोल दऱया, मोकळे आकाश, तापमान मायनस, अगदी अचानक, मायनस 40 पर्यंत घसरणारे तापमान, या ठिकाणी नॉर्मल ठिकाण पेक्षा पन्नास टक्केच प्राणवायू हवेत असतो. त्यामुळे बाईक कुठे अडकली तर दमछाक होते. काही चूक झाली तर कपाळमोक्ष ठरलेलाच. त्यामुळे योग्य काळजी घेत प्रतिकूल वातावरणाशी दोन हात करत संभाजी पवार आणि मावळे पोहोचले उमलिंग या ठिकाणी. समुद्र सपाटीपासून 19 हजार 300 फूट उंचावर, एवरेस्ट बेस कॅम्प पेक्षा उंचावर. परतत असताना त्यांचा रस्ता चुकला. तीन तास भटकत राहिले. आजूबाजूला चिटपाखरूही नाही. मोबाईलला रेंज नाही. पण शेवटी मार्ग सापडला. आणि दहा तास बाईक प्रवास करून मावळे उनले येथे पोहोचले, त्यांनी केलेल्या विक्रमाबाबत त्यांचे अभिनंदन होत आहे.
पत्नीच्या अपघाती निधनानंतर राईडींगला नव्याने प्रारंभ
संभाजी पवार हे साताऱयातील व्यावसायिक असून त्यांना रायडिंगचा नाद आहे. त्यांच्या पत्नी शुभांगी यांनाही रायडींग आवडत होती. गतवर्षी त्यांचा रायडिंगमध्ये ट्रकच्या चाकाखाली सापडून अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने संभाजी पवार हे खचून गेले होते. त्यांचा रायडिंगचा छंद पुढे सुरु राहिल का हा प्रश्न होता. परंतु त्यांनी तो छंद पुन्हा नव्याने सुरु करत विक्रम करुनच पत्नीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्याबद्दल त्यांचे सातारकरांकडून कौतुक होत आहे.