भगवंत म्हणाले, मनाच्या आहारी गेलेला जीवात्मा मनाशी एकरूप होऊन मनाच्या सुखदुःखांच्या व्याधी आपल्या माथी घेऊन सहन करतो. मनाने त्याला संसारी करून ठेवले आहे, त्यामुळे तो अनेक जन्ममरणे व रात्रंदिवस अनेक सुखदुःखे सोशीत असतो. थोडक्मयात जीवात्मा हा मनाच्या आहारी गेला असल्याने त्याला मनापासून वेगळा करण्यासाठी इतर उपाय करण्याची गरज असते. तो दुसरा उपाय म्हणजे, मनालाच निग्रह करायला लावणे हे शक्मय झाले तरच जीवाचे दुःख टळेल. अन्यथा मनाच्याच नादाने नाचत राहिले तर सर्व आयुष्य फुकट जाते. मनाचा निग्रह करण्यासाठी अनेक साधने आहेत.
दान, स्वधर्माचे पालन, यमनियम, वेदाध्ययन, सत्कर्मे आणि व्रतांचे पालन ही सर्व कर्मे मनाचा निग्रह करण्यासाठी असतात कारण मनाची एकाग्रता हाच परम योग आहे. अर्थातच वरील गोष्टींचे पालन करत असताना आपण या गोष्टी मनोनिग्रह साधण्यासाठी करत आहोत याचे सतत भान ठेवावे लागते.
अन्यथा वरील गोष्टी कितीही कसोशीने पाळल्या तरी त्या वाया जातात. मनोनिग्रहाचे उद्दिष्ट बाजूला ठेवून, जर एखादा त्या करत असेल तर त्यामागे नावलौकीक मिळवण्याची धडपड असते म्हणून मनोनिग्रहाकडे लक्ष न देता सर्वस्वही दान दिले, तर दाता काय तो एक मीच असा अभिमान होतो. मनोनिग्रहाचे वर्म चुकून वर्णाश्रमधर्म आचरण केला असता त्याच्या योगाने मनोधर्म आनंदभराने बळावतो आणि ‘माझे स्वकर्म हेच अत्यंत श्रे÷’ असे वाटू लागते. त्रिभुवनांत मीच काय तो एक आचारसंपन्न, असे वाटून स्वधर्मादि आचरणाने मन अधिकच चवताळून जाते.
मनाचे नियमन करण्याची बुद्धी नसेल तर यम-नियम हीसुद्धा एक उपाधीच आहे. कारण त्यामुळे, ‘खरोखर साधक काय तो मीच’ हेच मनोधर्म नेहमी सांगत असतो. वेदशास्त्र श्रवण केले असता गर्वाची भयंकरच भरती येते. पांडित्यामध्ये अतिशय अभिमान उत्पन्न होतो. तेथे मनाचे नियमन कसे होणार? आपलेच कर्म करावयास जावे, तर कर्मक्रिया अत्यंत कठीण आहे. त्या कर्मठपणाचाच मोठा भ्रम वाढतो, तेथे मनाचे नियमन कसे घडणार? कर्म हे केवळ देहाच्या ठिकाणी आहे. जीवात्मा देहात असूनही तो विदेहस्थितीत आहे. त्याला कर्माने कर्मबद्धता प्राप्त होते, असे कर्मठ लोक मूर्खपणाने वागतात.
असंख्य व्रते करून व्रतस्थ झाले असताही ते त्याबद्दल धनधान्य मिळावे अशी इच्छा करतात. कारण त्यांच्या मनात मनोनिग्रह नसतो. चांगली चांगली केलेली व्रतेही अशा रीतीने व्यर्थ जातात. दानादिक सात साधने ही ज्ञानाचीच अंगभूत आहेत, तरीही ती सर्वच साधने निष्फळ आहेत असे येथे कसे म्हणावे? ह्याचे उत्तर असे की, येथे दानादिक जी जी साधने आहेत, त्यांना इहपरलोकी फळ येते, पण ते फळच येथे निष्फळ होते आणि जन्ममरणांना वाढविते. ह्यात साधक ज्ञानसंपन्न असला, तर तो फळाची आशा निखालस सोडून देऊन दानादिक स्वधर्माचरण करील आणि ते मात्र त्याच्या चित्तशुद्धीला उपयोगी होईल. परंतु ‘माझी चित्तशुद्धी व्हावी’ अशी बुद्धी उत्पन्न होण्याला आधी भगवंताची कृपा पाहिजे. तरच साधने सिद्धीला जातात. सर्व साधनात माझी भक्ती हीच मुख्य होय. त्यातही नामाची कीर्ती विशेष आहे. नामाने चित्ताची शुद्धी होते आणि साधकांना स्वस्वरूपस्थिती प्राप्त होते.
नामाहून श्रे÷ असे साधन दुसरे मुळीच नाही. उद्धवा! नामाने खरोखरच संसारबंधाचे छेदन होते हे लक्षात ठेव.
स्वस्वरूपाच्या ठिकाणी राहून मन निश्चळ झाले की, साधन निघून जाते ज्याप्रमाणे प्रवास पूर्ण झाला की, वाहनाचे काम संपते त्याप्रमाणे मनोनिग्रह साध्य झाला की, दानादिक साधनांचे कारण आपोआपच खुंटते असे समज. ज्याचे मन एकाग्र होऊन एकदम शांत झाले, त्याला दान इत्यादींची काय आवश्यकता आहे, सांग ना! परंतु ज्याचे मन चंचल असून आळस इत्यादी दोषांनी भरलेले आहे, त्याने दानादी कर्मे केली, तरी त्यांचा काय
उपयोग ?
क्रमशः