पेपर लीकप्रकरणी वसुंधरा राजे कडाडल्या
माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी आसपूर विधानसभा मतदारसंघातील जाहीर सभेत पेपर लीक प्रकरणावरून अशोक गेहलोत सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राजस्थानात काँग्रेसचे सरकार असताना 19 वेळा पेपर लीकच्या घटना घडल्या. हा प्रकार यापूर्वी कधीच घडला नव्हता. येथील युवांची फसवणूक झाली असून यामुळे त्यांचे भविष्य अंधकारमय झाल्याची टीका राजे यांनी काँग्रेसवर केली आहे.
गेहलोत सरकार राज्यात अनेक शाळा सुरू केल्याचा दावा करत आहेत, परंतु दुसरीकडे या शाळांमध्ये शिक्षकच नाहीत. अशा स्थितीत तेथे मुलांना शिक्षण काय मिळणार? राजस्थानात एकदा नव्हे 19 वेळा प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटना घडल्या आहेत. पेपर लीक झाल्याने बेरोजगार युवकांचे भविष्य संकटात सापडले आहे. युवांमध्ये स्वत:ला फसविले गेल्याची भावना निर्माण झाल्याचा आरोप भाजप नेत्याने केला आहे. मागील निवडणुकीवेळी काँग्रेसचा एक नेता प्रचारासाठी आला होता. त्याने लोकांना 1-10 पर्यंत अंक मोजून दाखविले होते आणि शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार असल्याची घोषणा केली होती. परंतु काँग्रेस सत्तेवर येऊन 5 वर्षे उलटली तरीही कर्ज माफ करण्यात आले नाही असे म्हणत वसुंधरा राजे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लक्ष्य केले आहे.
वसुंधरा राजे यांनी राजस्थानात जातीय राजकारण करणाऱ्या बीटीपी आणि बीएपी या स्थानिक पक्षांनाही लक्ष्य केले आहे. हे पक्ष आदिवासींचे समर्थक असल्याचे सांगतात, परंतु आदिवासी महिलेला राष्ट्रपती होण्याची संधी मिळाल्यावर हे पक्ष काँग्रेसच्या कुशीत शिरल्याची टीका राजे यांनी केली आहे.