ऍड. हृदयनाथ शिरोडकर यांची मागणी
प्रतिनिधी /पणजी
काँग्रेस पक्षाच्या मदतीने आंदोलन केले अशाप्रकारचे कारणे देऊन अंगणवाडी युनियनला सेवेतून निलंबित करण्यात आले. जर दीपाली नाईक अशा प्रकारची कारणे देऊन कर्मचाऱयांना निलंबित करत असतील तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. दीपाली नाईक यांना या मोठय़ा पदावर बसण्याचा अधिकार नाही. दीपाली नाईक या भाजपच्या पगारावर सरकारी कर्मचाऱयाचे पद भूषवित आहेत असा आरोप अंगणवाडी कर्मचाऱयांचे नेते ऍड. हृदयनाथ शिरोडकर यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला.
सेवेतून निलंबित केल्यानंतर आपल्या हक्कासाठी सहा दिवस अंगणवाडी शिक्षिका धरणे आंदोलनाला बसले आहेत. तरीही सरकारने याकडे दखल घेतली नाही. याच पार्श्वभूमीवर अंगणवाडी कर्मचाऱयांतर्फे साखळी उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देवयानी तामसे यांनी ज्या युनियनच्या अध्यक्ष आहेत त्यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. त्यानंतर एक एक कर्मचारी सदर उपोषण सुरूच ठेवेल. जर सरकारने या बेकायदेशीर निलंबनावर कारवाई केली नाहीतर हे आंदोलन उग्र होईल. सरकारने लवकरात लवकर यावर कारवाई करणे आवश्यक असून कर्मचाऱयांचे बेकायदेशीर निलंबन मागे घ्यावे व दीपाली नाईक यांना पदावरून हटवावे अशी मागणी ऍड. हृदयनाथ शिरोडकर यांनी यावेळी केली.
निवडणूकांपूर्वी अंगणवाडी शिक्षिकांनी नोकरीत सन्मान आणि हक्क मिळावा यासाठी आंदोलन छेडले होते. या आंदोलनातून मुख्य़मंत्र्यांनी आमच्या काही मागण्या मंजूर केल्या होत्या. पगारवाढ, निवृत्ती वेतन वाढविण्यात व इतर मागण्या मंजूर केल्या होत्या. याशिवाय आंदोलनात सहभागी झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱयांवर कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले होते. त्याप्रमाणे निवडणूक व सरकार स्थापन होईपर्यंत अंगणवाडी कर्मचाऱयांवर कारवाई झाली नाही. परंतु मंत्रिमंडळानंतर लगेचच या आंदोलनात सहभागी झालेल्या सात जणांवर म्हणजेच युनियनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, दोन सचिव, खजिनदार यांच्यावर नोकरीवरून काढण्याचे आदेश महिला व बालकल्याण खात्याकडून देण्यात आले. नोकरीवरून काढण्याचे कारण त्यांनी काँग्रेस पक्षाची मदत घेतली हे सांगितले. पक्षाच्या नावावर कर्मचाऱयांना निलंबित करणे म्हणजे कर्मचाऱयांवर अन्याय करणे आहे असे शिरोडकर यांनी यावेळी सांगितले.