वारंवार होणाऱया अपघातांमुळे तीव्र संताप
प्रतिनिधी /येळ्ळूर
येळ्ळूर-वडगाव रस्त्यावरील केएलईपासून येळ्ळूर सीमेपर्यंत दोन्ही बाजूला गवत वाढले आहे. त्यामुळेच लहान-मोठे अपघात घडत आहेत. नुकताच एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. तेव्हा हे दोन्ही बाजूचे गवत तातडीने काढावे. याचबरोबर त्या ठिकाणी आलेला चिखल, माती तसेच इतर कचराही हटवावा, अशी मागणी येळळूर ग्रामस्थांतून तसेच वाहनचालकांतून होत आहे.
आनंदनगर-वडगावपासून ते बळ्ळारी नाल्यापर्यंत असलेल्या नाल्याची खोदाई करून त्याची माती बाजूलाच टाकली जाते. कायमस्वरुपी पक्का नाला बांधून त्याच्यातील गाळ काढून तो तातडीने बाजूला नेऊन टाकला पाहिजे. मात्र दरवषी जेसीबी नेऊन लावायचे आणि तो गाळ रस्त्याच्या बाजूलाच टाकायचा, असा प्रकार नेहमीचाच सुरू आहे. येळ्ळूरचा रस्ता खचलाही आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या पट्टय़ा देखील खचल्या असून रस्त्यावरून वाहन खाली घेणे कठीण झाले आहे.
अशाप्रकारांमुळे चंद्रकांत कांबळे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आता दोन्ही बाजूला मोठे गवत वाढले असून समोरून येणारे वाहन देखील दिसत नाही. रात्रीच्यावेळी तर नक्कीच अपघात घडू शकतात. तेव्हा तातडीने या परिसरातील वाढलेले गवत तसेच इतर झाडेझुडपे काढावीत, अशी मागणी होत आहे.