ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Ghagat Singh Koshyari) व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांंनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. तर विरोधकांकडून भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तर केंद्राने महाराष्ट्रात पाठवलेले सॅम्पल घरी पाठवावे, अन्यथा चांगलं वृद्धाश्रम असेल तिकडे पाठवा,” असे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटलंय.
दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना हटवलं नाहीतर महाराष्ट्र (Maharashtra) प्रेमींनी एकत्र येऊन विरोध केला पाहिजे. असंच चालत राहिलं, तर आपल्या शूरवीर राज्याच्य अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली जातील. आपल्याला फक्त मग बघत बसावे लागले. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्र द्रोह्यांना इंगा दाखवला पाहिजे. वेळ आली तर महाराष्ट्र बंद करण्याचं देखील पाहू, असा इशारा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
हे ही वाचा : भगतसिंह कोश्यारी दिल्लीत; राज्यपाल पदावरून उचलबांगडी होणार?
मुंबईत ते पत्रकार परिषद बोलत होते. महाराष्ट्रातील पुरुषांबद्दल सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भगतसिंह कोश्यारी यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी यावेळी घणाघात केला. ‘केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्या विचारसरणीची माणसं देशातल्या विविध राज्यांत राज्यपाल म्हणून पाठवली जातात. त्याची कुवत आणि पात्रता काय असते? ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नाही अशांना राज्यपाल नेमलं जातं का?,’ असा सवाल त्यांनी कोश्यारींचं नाव न घेता केला.
‘राज्यपालपदाची झूल अंगावर आली की काहीही बोललं तरी चालतं असं कोणाला वाटत असेल तर ते महाराष्ट्र मान्य करणार नाही. कोश्यारींना राज्यपाल म्हणणंच मी सोडून दिलंय. पण, ते केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्या विचारसरणीचे असल्यानं त्यांची वक्तव्यं गांभीर्यानं घ्यावी लागतात. याच कोश्यारींनी काही दिवसांपूर्वी मुंबई व ठाण्याचा अपमान केला होता. त्यांना कोल्हापुरी जोडा दाखवण्याची वेळ आली आहे असं मी तेव्हाच म्हटलं होतं. पण ते थांबत नसल्याचं दिसतंय. त्यांनी आता आमच्या दैवतावर बोलण्याची हिंमत केलीय. हे केवळ त्यांच्या काळ्या टोपीतून आलेलं नाही. त्या टोपीमागचा सडका मेंदू कोणाचा आहे याचा शोध घेण्याची वेळ आली आहे,’ असं सूचक वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं.