आमदार संकल्प आमोणकर यांचे पंतप्रधानांना पत्र
प्रतिनिधी /पणजी
केंद्रीय महिला व बालविकासमंत्री स्मृती इराणी यांना मंत्रीपदावरून हटवण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली असून तसे पत्र काँग्रेसचे आमदार व विधिमंडळ गटाचे उपनेते संकल्प आमोणकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे.
गोव्यात आसगाव येथे इराणी कुटुंबातर्फे बार चालवण्यात येत असून त्याला बेकायदेशीर परवाना देण्यात आला आहे. त्या बारचे बांधकामही बेकायदेशीर असून अनेक नियम पायदळी तुडवून बारला परवाने देण्यात आले आहेत. हा उद्योग ‘बेनामी’ चालू असल्याचा दावा पत्रातून करण्यात आला आहे. केंद्रात तसेच गोव्यात भाजपची राजवट असल्याने इराणी यांना संरक्षण देण्यात येत असून तक्रारी करूनही संबंधित खाती या प्रकरणात कोणतीच कारवाई करीत नसल्याचे आमोणकर यांनी पत्रात म्हटले आहे.
मुख्यमंत्री तसेच महिला-बालविकासमंत्री यांच्याकडून या प्रकरणात न्याय मिळण्याची शक्यता नाही. कारण ते सर्वजण इराणी यांना ‘बॉस’ समजतात, असे पत्रातून नमूद केले आहे. त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून हटवावे आणि निःपक्ष चौकशी करावी, अशी मागणी संकल्प आमोणकर यांनी पत्रातून केली आहे. चौकशीतून इराणी यांना ‘क्लिन चीट’ मिळाली तर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात समाविष्ट करावे, असेही आमोणकरांनी पत्रात म्हटले आहे.