परिसरात पाणीपुरवठा लवकरच होणार सुरळीत
प्रतिनिधी /बेळगाव
कचेरी रोड, शनिवार खूटजवळ फुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती शुक्रवारी करण्यात आली. त्यामुळे परिसरात पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. शहरात ठिकठिकाणी खोदाई आणि इतर कारणाने जलवाहिन्या फुटल्या आहेत. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होताना दिसत आहे. याची दखल घेऊन मनपामार्फत फुटलेल्या जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
रस्ते विकास, गटारी, डेनेज लाईनच्या खोदाईमुळे जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार वाढले आहेत. शिवाय अनेक ठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागली आहे. त्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. याकरिता जलवाहिन्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेणे आवश्यक आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जात आहे. शहरात एकीकडे पाणीटंचाई निर्माण होत आहे. तर दुसरीकडे जलवाहिन्या फुटून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. याबाबत पाणीपुरवठा कंपनीने जागृत राहून जलवाहिन्यांची गळती तातडीने बंद करणे गरजेचे आहे.
तातडीने दुरुस्ती नसल्याने
पाणी वाया शहरातील पाणीपुरवठय़ाचे काम एलऍण्डटी कंपनीकडे सोपविण्यात आल्यापासून शहरातील पाणीपुरवठा सातत्याने विस्कळीत होत आहे. त्यामुळे शहरवासियांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. शहरात अनेक ठिकाणी जलवाहिन्या फुटणे, क्हॉल्व गळती आणि इतर कारणाने पाणी वाया जात आहे. त्यामुळे तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेवून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.