वार्ताहर /कणकुंबी
बेळगाव-चोर्ला-पणजी रस्त्याचे अस्तित्व नष्ट होऊन खड्डेमय रस्ता बनला आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी चोर्ला रस्ता बंद होण्याची शक्मयता आहे. गोवा किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी स्थानिक पातळीवर आपली वाहने या रस्त्यावरून धावली पाहिजेत. यासाठी चोर्ला ग्रामस्थांनी बुधवारी चोर्ला रस्त्यावरील खड्डे श्रमदानातून बुजवून प्रशासनाला हेवा वाटेल असे कार्य केले आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
दोन-तीन महिन्यांपासून बेळगाव-चोर्ला-पणजी रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून अवजड वाहने रस्त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरली आहेत. या रस्त्यावरून 30 ते 40 टन वजन वाहतूक करणारी शेकडो वाहने ये-जा करत आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी भले मोठे खड्डे पडले आहेत. पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने रस्ता लवकर खराब होतो. सद्यस्थितीत रस्त्याच्या दुतर्फा गटारही व्यवस्थित नाही. पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहून जाऊ शकत नाही. विशेषतः लहान गाडय़ांना किंवा दुचाकीस्वारांना त्याचा फटका बसत आहे. चिखले क्रॉसपासून गोवा हद्द म्हणजे चोर्लापर्यंत रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. वाहनधारकांना तारेवरची कसरत करावे लागत आहे. हा प्रवास जीवघेणा असून अपघात होत आहेत. याच खड्डय़ांमुळे आमटे येथील युवकाचा बळी गेला होता.
कणकुंबी-चोर्ला परिसरातील नागरिक गोव्याला दररोज ये-जा करतात. यासाठी चोर्लावासियांनी रस्ता करण्याचा निर्णय घेतला. गावातील महिला वर्गाने पुढाकार घेऊन रस्त्याची तात्पुरती डागडुजी केली. प्रशासन मात्र अजगरासारखे स्वस्थ बसले आहे. सद्यस्थितीतील रस्त्यावरील खड्डे पाहता हा रस्ता कोणत्याही क्षणी बंद पडण्याची शक्मयता आहे.
दोन-चार दिवसांपूर्वी कुसमळीच्या युवकांनी मलप्रभा नदी पुलावरील खड्डे दगड-माती घालून पुलावरून होणारी वाहतूक काहीअंशी सुरळीत केली आहे. कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील पूल अत्यंत धोकादायक बनला असून पुलावर मोठमोठे खड्डे पडले होते. हा धोका लक्षात घेऊन कुसमळीच्या अनंत सावंत, पावणू कोडचवाडकर व इतरांनी पुलावरील खड्डे श्रमदानाने बुजविले. सद्यस्थितीत स्थानिकांना रस्त्याची गरज असल्याने गावातील युवक-महिला असे उपक्रम हाती घेत असल्याने चोर्ला आणि कुसमळी गावचे अभिनंदन तर प्रशासनाबद्दल मात्र तीव्र खेद व्यक्त केला जात आहे.