कणकुंबी ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : खानापूर तालुक्यातील कणकुंबी येथील माउली देवीचा यात्रोत्सव कार्यक्रम 8 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत होणार आहे. तब्बल 14 वर्षांनंतर ही यात्रा होणार असून या यात्रेसाठी 5 लाख भाविक जमणार आहेत. तेव्हा किणयेपासून जांबोटी, कणकुंबी आणि गोव्याच्या हद्दीपर्यंतचा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी कणकुंबी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. सदर रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला आहे. या रस्त्यासाठी निधीदेखील मंजूर करण्यात आला आहे. रस्त्याचे रुंदीकरण तसेच डांबरीकरण करण्यात येणार आहे. मात्र वनविभागाने त्याला हरकत घेतल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. मात्र आता तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
माउली देवस्थान हे जागृत आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातूनही मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे वाहनांची वर्दळ वाढणार आहे. मात्र सध्या रस्त्यावर ख•s पडले असून अनेक ठिकाणी खचला आहे. त्यामुळे वाहने चालविणे अवघड झाले आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 3 कोटी रुपये मंजूरही झाले आहेत. तेव्हा तातडीने संबंधित कंत्राटदाराला रस्ता करण्यास भाग पाडावे, अशी विनंती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे करण्यात आली. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी तातडीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला व त्या रस्त्याचे काम तातडीने करा, असे सांगितले. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे, प्रेरणा नाईक, दत्ता खोरवी, चंद्रकांत वाडेकर, विष्णू खोरवी, वसुदा खोरवी, उत्तरा खोरवी, अमृता वाडेकर, शांताराम गवस, विद्या गवस, सोनम दळवी, अश्विनी वाडेकर, ममता गुरव, मेघना नाईक, मिताली नाईक, संस्कृती पाटील, मंदा नाईक, वनिता नाईक यांच्यासह कणकुंबी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.