ग्रामपंचायतीकडून तहसीलदार कार्यालयाकडे निवेदनाद्वारे मागणी
वार्ताहर /किणये
बिजगर्णी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात काम करणाऱया अभियंत्याची बदली करा, अशा मागणीचे निवेदन बिजगर्णी ग्रा. पं. च्यावतीने तहसीलदार कार्यालयात गुरुवारी देण्यात आले.
बिजगर्णी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील बिजगर्णी, कावळेवाडी, यळेबैल, राकसकोप या गावांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे काही जणांची घरे कोसळली आहेत. कोसळलेल्या घरांची पाहणी करून झालेल्या नुकसानीचा अहवाल अभियंत्यांनी पाठविण्याची गरज असते. मात्र, बिजगर्णी कार्यक्षेत्रातील ‘त्या’ अभियंत्याचे या कामांकडे दुर्लक्ष झाले आहे. अनेकवेळा सांगूनही कानाडोळा करण्यात येत आहे. तसेच ज्यांची घरे कोसळलेली आहेत ते नुकसानग्रस्त ग्रा. पं. सदस्यांना व ग्रा. पं. मध्ये येऊन विचारणा करीत आहेत. त्यांना उत्तर देणे अवघड होऊ लागले आहे. अभियंत्याचे या समस्येकडे दुर्लक्ष झालेले आहे. यामुळे बिजगर्णी भागातील नागरिकांना पंचायतीकडे हेलपाटे मारावे लागत आहेत.
त्या अभियंत्याची बदली करून कार्यक्षम व जनतेची कामे करणाऱया अभियंत्याची नियुक्ती करा, अशी मागणी बिजगर्णी ग्रा. पं. ने केली आहे. तहसीलदार कार्यालयातील अधिकारी असोदे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. यावेळी ग्रा. पं. अध्यक्ष मनोहर बेळगावकर, ऍड. नामदेव मोरे, ग्रा. पं. सदस्य महेश पाटील, मेहबूब नावगेकर, अप्पू कांबळे, परशराम कांबळे आदी उपस्थित होते.