बेळगाव : जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा क्रीडांगणावर प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आकर्षक पथसंचलनही झाले. प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ, जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. आदी अधिकारी उपस्थित होते.
सकाळी 9 वाजता पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. बेळगाव हा विस्ताराने मोठा जिल्हा आहे. स्वातंत्र्यलढ्यात अनेक नेत्यांनी बलिदान दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पायही बेळगावला लागले आहेत. भारतीय राज्यघटनेने प्रत्येकांना हक्क आणि कर्तव्ये दिली आहेत. सामाजिक न्याय, समानता व अभिव्यक्ती स्वातंत्र्य घटनेमुळेच मिळाले, असे गोविंद कारजोळ यांनी सांगितले.