इंडियन असोसिएशन ऑफ डर्मेटॉलॉजिस्टस्च्या 13 व्या अधिवेशनात डॉ. प्रभाकर कोरे यांचे प्रतिपादन
बेळगाव / प्रतिनिधी
वैद्यकीय शास्त्राची प्रगती वेगाने आणि चौफेर होत आहे. हीच स्थिती चर्मरोगशास्त्राचीही (डर्मेटॉलॉजी) आहे. अशा परिस्थितीत चर्मरोगशास्त्रात होणार शैक्षणिक संस्थांतर्गत संशोधन आणि त्याचे आदानप्रदान यामुळे या क्षेत्रातील डॉक्टरांना बरेच काही नवीन शिकावयास मिळत आहे, असे प्रतिपादन केएलई ऍकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रीसर्च या संस्थेचे चान्सेलर डॉ. प्रभाकर कोरे यांनी केले. ते इंडियन असोसिएशन ऑफ डर्मेटॉलॉजी च्या 13 व्या अधिवेशनात उद्घाटनपर भाषण करीत होते. हे अधिवेशन ‘क्युटिकॉन-22’ म्हणून ओळखले जात आहे. हे अधिवेशन जे. एन. मेडिकल कॉलेज, डर्मेटॉलॉजी असोसिएशन ऑफ बेळगावी, आणि बेलगाम इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस (बीआयएमएस) यांच्या संयुक्त विद्यमाने केएलई कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित केले गेले आहे.
चर्मरोगशास्त्र ही वैद्यकीय विज्ञानाची वेगाने विस्तार पावणारी शाखा आहे. त्वचा आपल्या संपूर्ण शरिराला झाकून टाकते. त्वचेला सोरायसिस, व्हिटिलिगो, भाजणे, त्वचा कर्करोग इत्यादी अनेक रोग होतात. यांपैकी काही रोगांवर प्रदीर्घकाळ उपचार लागतात. या संदर्भात संशोधन, उपचार कौशल्य, ज्ञान, वैद्यकीय तंत्रे आणि अनुभव यांचे आदानप्रदान होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
इंडियन असोसिएशन ऑफ डर्मेटॉलॉजी ही भारतातील दुसऱया क्रमांकाची मोठी वैद्यकीय संस्था आहे. ही संस्था या क्षेत्रात स्पृहणीय कार्य करीत आहे, असे प्रतिपादन या संस्थेचे महासचिव डॉ. दीनेश कुमार यांनी केले. केवळ शिक्षणच समाज परिवर्तन घडवू शकते, असा संदेश डॉ. दीनेश कुमार यांनी दिला.
या कार्यक्रमात डॉ. सुभाष मांजरेकर यांनी उपस्थितांचे स्वागत करुन त्यांचा परिचय करुन दिला. डॉ. एस. सी. नटराज यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. चर्मरोगशास्त्र ही शाखेत त्यांच्या महत्वपूर्ण योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. या प्रसंगी डॉ. रवी यादय यांचे भाषण झाले. डॉ. एन. एस. महंतशेट्टी (आय अँड सी व्हाईस चान्सेलर, केएएचईआर), डॉ. व्ही. ए. कोठीवाले, डॉ. अशोककुमार शेट्टी, डॉ. रवी राठोड, डॉ. प्रकाश कोलोलगी, डॉ. सविता ए. एस. डॉ. डी. पी. जयंत, डॉ. वीरेश डी., डॉ. शिवकुमार पाटील, डॉ. सुश्रता कामोजी,डॉ. सतीश गोखले, डॉ. संतोष शिंदे, डॉ. ए. एम. पंडित, डॉ. भावना दोशी आदी 500 हून अधिक प्रतिनिधी या तीन दिवशीय अधिवेशनास उपस्थित आहेत. चर्चासत्रे, शास्त्रीय चर्चा, कार्यशाळा, पोस्टर पेझेंटेशन, केस डिस्कशन्स आदी कार्यक्रम या तीन दिवसांमध्ये आयोजित होणार आहेत.