मीरा यांच्या रेशीमबंध आवर्तन दुसरे पुस्तकाचे प्रकाश सोहळा
प्रतिनिधी / बेळगाव
आज मातृ भाषेतून शिक्षण घेणाऱयांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे भाषेची परवड होत आहे. अशावेळी उत्तमोत्तम पुस्तके वाचकांच्या हाती देणे आवश्यक आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाला जवळ करताना ऍडीओ बुकची सुध्दा तितकीच गरज भासणार आहे. रेशीमबंध हे पुस्तक वाचकांच्या पसंदीस उतरेल. मात्र ऍडीओ स्वरुपातही ते द्यायला हवे, असे मत तरुण भारतचे समुह प्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी व्यक्त केले.
बेळगावच्या कवियत्री मीरा तारळेकर यांच्या ‘रेशीमबंधः आवर्तन दुसरे’ या पुस्तकाचे प्रकाश गुरूवारी आरपीडी महाविद्यालयातील केएएम गिरी सभागृहात झाले. यावेळी ते अध्यक्ष स्थानावरुन बोलत होते. व्यासपीठावर माजी केंद्रिय मंत्री ऍड. रमाकांत खलप, डॉ. भूषण भावे, डॉ. गोविंद काळे, लेखिका मीरा तारळेकर, किशोर अर्जुन उपस्थित होते. प्रारंभी किशोर अर्जुन यांनी प्रास्ताविक केले.
किरण ठाकुर म्हणाले, बेळगाव ग्रामीण भागात साहित्य संमेलन सुरू करण्यात माधवीताई यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी विशेषतः ग्रामीण भागात साहित्याच्या जागर आणि उत्साहाची सुरूवात केली आहे. त्या बेळगावमधील एक विलक्षण व्यक्तीमत्व आहेत. त्यांनी अनेकांना प्रेम दिले आहे. त्या बेळगावात देखील अनेक वर्षे राहिल्या आहेत. शिवाय गोव्यात जाऊन प्रचंड साहित्य निर्मिती केली आहे. शिवाय तेथील प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा,
यावेळी रमाकांत खलप म्हणाले, मी बेळगावात प्रथम 1968 ला आलो आणि माझ्या वाटचालीची भूमी बेळगाव झाली. माधवीताईंनी समस्यांवर मात करुन जे कार्य केले आहे ते उल्लेखनिय आहे. बेळगावने गोव्याला सगळं काही दिलं आहे. गोव्याचा स्वातंत्र लढा बेळगावकरांनी पुढे नेला आहे. त्यामुळे बेळगावचे ऋण गोव्यावर आहेत.
डॉ. गोविंद काळे यांनी अलिकडच्या जीवनात वाईट गोष्टींनी थैमान माजविले आहे. अशा परिस्थितीत पुस्तकेच आपल्याला आधार देतील. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख-दुःख येत असतात. व्यक्तीगत दुःख बाहेर सोडून प्रत्येकांनी चांगल्या गोष्टींचा संचय केला पाहिजेत. रेशीमबंध पुस्तकात भाव दिसून येतात. त्याबरोबर शिर्षक देखील बोलके झाले आहे. त्यामुळे हे पुस्तक प्रत्येकाला आपलेसे वाटणारे आहे. शिवाय भावस्पर्श लेखन असल्याने आपल्याला शोधायच्या वाटा या पुस्तकात दिसून येतात.
डॉ. भूषण भावे म्हणाले, रेशीमबंध ही आवृत्ती नाही तर आवर्तन आहे. यामध्ये बरंच काही आपल्याला शिकण्याजोगे आहे. बेळगावच्या मातीत बरच काही असून बेळगावने गोव्याच्या मुक्तीसाठी खस्ता खाल्या आहेत. आजच्या जीवनात आपलं कुटुंब एवढीच संकल्पना आहे. मात्र रेशीमबंधमध्ये एक वेगळं साहित्य पहायला मिळते. रेशीमबंध हे सुर्यासारखे धगधगणारे असल्याने यामध्ये व्यक्तीमत्वाचे अनेक थर उलगडले गेले आहेत.
यावेळी लेखिका मीरा तारळेकर यांनी माझ्या आईने साहित्य क्षेत्रात ललितलेख आणि इतर लेखन केले आहे. शिवाय अनाथ आश्रमांसाठी मोठे कार्य केले आहे. प्रत्येक कवीचा पहिला कविता संग्रहाचे प्रकाशन हा कौतुकाचा सोहळाच असतो. रेशीमबंधमध्ये एक मुलगी भयानरात्री आकाशाकडे पाहत बसली आहे. दरम्यान भूमी म्हणजेच धर्ती तीला सहकार्य करत असून तीच्या मनातील छटा या पुस्तकात मांडल्या आहेत. यावेळी डॉ. गोविंद काळे, यशोदा काटकर, रुपा कुलकर्णी, संपदा कुंकळकर, मेधा मराठे, उत्कर्ष बेल्लद आदींचा गौरव करण्यात आला. प्रारंभी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालक अनघा वैद्य व तेजस्वीनी सोमसाळे यांनी केले. तर किशोर अर्जुन यांनी आभार मानले. याप्रसंगी साहित्यरसिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.