ऑनलाईन टीम / तरुण भारत :
कसबा पोटनिवडणुकीत मनसेने स्वत:चा उमेदवार न उतरवता भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे नाराज झालेल्या पदाधिकाऱ्यांनी मविआच्या उमेदवाराचा प्रचार केला. सात पदाधिकाऱ्यांवर पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या कारवाईनंतर 50 मनसैनिकांनी पक्षाला रामराम ठोकला. पुण्यात मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
रवींद्र खेडेकर, सागर पांगारे, गोपी घोरपडे, अनिल चांदांगे, रिझवान बागवान, प्रकाश ढमढेरे आणि नीलेश निकम अशी पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. भाजपचे मतदान वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे, असे मनसैनिकांना सांगण्यात आले होते. मात्र, हे सर्वजण कसब्यातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारात उतरले. याची माहिती मनसेच्या स्थानिक नेत्यांना मिळाली. त्यानंतर शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी पत्र काढत या 7 जणांची पक्षातून हकालपट्टी केली.
दरम्यान, या कारवाईनंतर 50 मनसैनिकांनी पक्षातील पदांचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्याकडे पाठवल्याची माहिती समोर आली आहे.
अधिक वाचा : भारत सरकारने कोल्हापुरच्या जवानाला केले ‘पळपुटा’ घोषित