पंतप्रधानांची ‘मन की बात’ ः भारताच्या विकासात महिलांचा वाटा बहुमूल्य असल्याचा दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी म्हणजेच 26 मार्च रोजी ‘मन की बात’च्या 99 व्या भागाला संबोधित केले. यावेळी त्यांनी महिला शक्तीचे कौतुक केले. यावेळी त्यांनी सियाचीनमध्ये पोस्ट केलेल्या पहिल्या महिला कॅप्टन शिवा चौहान यांचा प्राधान्याने उल्लेख केला. तसेच अवयवदान एखाद्याला नवीन जीवन देण्याचे मोठे माध्यम बनले आहे. माणसाच्या मृत्यूनंतर देहदान केल्यामुळे आठ ते दहा जणांना नवीन जीवन मिळू शकते असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
आज भारताची क्षमता नव्या जोमाने समोर येत आहे. त्यात आपल्या स्त्रीशक्तीचा मोठा वाटा असल्याचे पंतप्रधान म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी आशियातील पहिली महिला लोको पायलट सुरेखा यादव आणि ऑस्कर विजेत्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’च्या निर्मात्या गुनीत मोंगा आणि दिग्दर्शक कार्तिकी गोन्साल्विस यांचाही उल्लेख केला. महिला सक्षमीकरणाचे कौतुक करताना आज भारताची क्षमता नव्या जोमाने उदयास येत असून त्यात आपल्या महिलाशक्तीचा मोठा वाटा आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. तुम्ही आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांना सोशल मीडियावर पाहिले असेल. सुरेखाजी ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या पहिल्या महिला लोको पायलट बनल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भाभा अणु संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ ज्योतिर्मयी मोहंती यांचेही कौतुक केले.
अवयवदानासाठी वयाची अट रद्द
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’मधून अवयवदानाचे महत्व सांगितले. अवयवदानासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही. रुग्ण कोणत्याही राज्यात अर्ज करु शकतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. सरकारने अवयवदानासाठी 65 वर्षांखालची वयोमर्यादा ठरवली होती. मात्र, ही अट आता रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पंतप्रधान म्हणाले. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी अवयवदानासाठी पुढे यावे असे आवाहन पंतप्रधानांनी देशवासियांना केले. तुमचा एक निर्णय अनेकांचे प्राण वाचवू शकतो, आयुष्य घडवू शकतो असेही ते म्हणाले. अवयवदानाला प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्ण देशात समान धोरणावर काम केले जात आहे. या दिशेने राज्यांचे कायमस्वरुपी रहिवासी असण्याची अटही काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
पंजाबमधील सुखबीर सिंग संधू कुटुंबीयांप्रती कृतज्ञता
आजच्या मन की बात कार्यक्रमामधून पंतप्रधान मोदींनी अमृतसरमध्ये राहणाऱया एका खास कुटुंबाशी थेट संवाद साधला. अमृतसरचे रहिवासी असलेले सुखबीर सिंग संधू आणि त्यांची पत्नी सुप्रीत कौर यांना एक मुलगी होती. घरातील लोकांनी प्रेमाने तिचे नाव अबावत कौर ठेवले. अबावत या चिमुकलीने अवघ्या 39 दिवसांत जगाचा निरोप घेतला होता. बाळाच्या मृत्यूनंतर वडील सुखबीर सिंग संधू आणि त्याची आई सुप्रीत कौर यांनी अबावतचे अवयवदान करण्याचा प्रेरणादायी निर्णय घेतला. पंतप्रधानांनी या दोघांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यासोबतच पंतप्रधान मोदी हे झारखंडच्या स्नेहलता चौधरी यांच्या निर्णयालाही कौतुकाचा थाप दिली. त्यांच्या कुटुंबाने देखील अवयवदान करण्याचा मोठा निर्णय घेतला होता.
ऊर्जा क्षेत्रातही अभूतपूर्व यश
जेव्हा मी जगभरातील लोकांना भेटतो तेव्हा ते अक्षय ऊर्जा क्षेत्रात भारताच्या अभूतपूर्व यशाचे कौतुक करतात असे पंतप्रधान म्हणाले. आज प्रत्येक देशवासीय सौरऊर्जेचे महत्त्व समजून घेत असल्याचे मला कौतुक असल्याचे पंतप्रधान म्हणाले.