वृत्तसंस्था/ ग्वाल्हेर
येथे सुरू असलेल्या इराणी करंडक क्रिकेट सामन्यात शुक्रवारी खेळाच्या तिसऱया दिवसाअखेर शेष भारत संघाने 275 धावांची आघाडी मिळविली आहे. शेष भारत आणि मध्यप्रदेश यांच्यात हा सामना खेळविला जात आहे.
या सामन्यात शेष भारत संघाने पहिल्या डावात 484 धावांचा डोंगर रचला. यशस्वी जैस्वालने शानदार द्विशतक (213), ईश्वरनने दीडशतक (154), यश धूलने 55 धावा जमविल्या. त्यानंतर मध्यप्रदेशने आपल्या पहिल्या डावात 294 धावा केल्या. मध्यप्रदेशने 3 बाद 112 या धावसंख्येवरून शुक्रवारी खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे शेवटचे 7 गडी 182 धावांची भर घालत तंबूत परतले. यश दुबने 258 चेंडूत 16 चौकारांसह 109, सारांश जैनने 1 षटकार आणि 7 चौकारांसह 66, कुशवाहने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 22 धावा केल्या. गवळीने 9 चौकारांसह 54 धावांचे योगदान दिले. शेष भारत संघातर्फे पी. नारंगने 65 धावात 4, नवदीप सैनीने 56 धावात 3, मुकेशकुमारने 44 धावात 2 आणि सौरभकुमारने 74 धावात 1 गडी बाद केला. शेष भारतने मध्यप्रदेशवर पहिल्या डावात 190 धावांची आघाडी मिळविली. त्यानंतर शेष भारतने दुसऱया डावात दिवसअखेर 1 बाद 85 धावा जमविल्या. कर्णधार अगरवाल खाते उघडण्यापूर्वीच पायचीत झाला. ईश्वरन आणि जैस्वाल या जोडीने संघाचा डाव सावरताना दुसऱया गडय़ासाठी अभेद्य 84 धावांची भागीदारी केली. जैस्वाल 1 षटकार आणि 8 चौकारांसह 58 धावांवर तर ईश्वरन 1 षटकार आणि 2 चौकारांसह 26 धावांवर खेळत आहे. या कसोटीतील खेळाचे दोन दिवस अद्याप बाकी असून शेष भारत संघाची स्थिती मजबूत असल्याचे जाणवते.
संक्षिप्त धावफलक
शेष भारत प. डाव 121.3 षटकात सर्वबाद 484, मध्यप्रदेश प. डाव 112.5 षटकात सर्वबाद 294 (यश दुबे 109, गवळी 54, सारांश जैन 66, कुशवाह 22, नारंग 4-65, सैनी 3-56, मुकेशकुमार 2-44, सौरभकुमार 1-74). शेष भारत दु. डाव 18 षटकात 1 बाद 85 (ईश्वरन खेळत आहे 26, जैस्वाल खेळत आहे 58, अगरवाल 0, कार्तिकेय 1-21).