महाराष्ट्रातील वातावरण अत्यंत तंग बनलेले असताना, या राजकारणाचा भाग असणाऱया काही जाणत्या मंडळींनी आता आपापल्या अनुयायांना शांत करण्याची वेळ आली आहे. अमरावती येथील एका हिंदू मुलीच्या बेपत्ता होण्याचे प्रकरण भाजपचे खासदार अनिल बोंडे आणि नवनीत राणा यांनी इतके ताणले की, त्यांना आता राज्यात आपलीच सत्ता आहे याचाही विसर पडला. आपण विरोधी पक्षाचे राजकारण करत आहोत अशा थाटात त्यांनी मुलीच्या बेपत्ता असण्याचे प्रकरण कथित लव जिहाद असल्याचा दावा केला. त्या प्रकरणी एका मुस्लिम युवकावर त्यांनी संशय व्यक्त केला आणि तपासावरही! विशेष म्हणजे पोलिसांनी संशयित युवकाची चौकशी केली. आधीच राज्याबाहेर अशा काही घटना घडत आहेत की, ज्याचे पडसाद देशभर उमटत असताना असे एखादे जातीय तणावाचे प्रकरण महाराष्ट्रात घडले तर ते आगीत तेल ओतण्याचे कारण ठरू शकेल. वैशिष्टय़ म्हणजे भाजपचे हे दोन खासदार इतका गवगवा करत असताना पोलीस शांत होते. खासदार राणा यांनी एका पोलीस अधिकाऱयाशी वाद घालून तो आपला फोन टॅप करत असल्याचा आरोप केला. काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणी दंगल घडली होती. असे असताना लोकप्रतिनिधींनी हे प्रकरण काळजीपूर्वक हाताळले पाहिजे होते. प्रत्यक्षात आततायीपणा झाला. आरोपी पोलिसांच्या ताब्यात असताना सुद्धा बेपत्ता मुलगी सापडत नाही हे पोलिसांचे अपयश आहे आणि त्या मुलीचे नेमके काय झाले? अशी शंकाही व्यक्त केली गेली. नंतर बेपत्ता मुलीचा ठाव लागला. तिने घरगुती वादाला कंटाळून शिक्षणासाठी गोव्याला जाण्यास घर सोडले असून ती रेल्वे प्रवास करत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी संबंधित मुलीचा जबाब नोंदवला असून हे प्रकरण लव जिहादचे नाही याचाही खुलासा झाला. याप्रकरणी ज्या मुस्लिम युवकावर आरोप केले गेले त्याने आता खासदारांवर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अशा संवेदनशील प्रकरणांचा वापर आपल्या प्रसिद्धीसाठी करणाऱया लोकप्रतिनिधींना त्यांच्या पक्षाने वेळीच आवर घातलेला बरा. दुसरी घटना दादरमध्ये घडलेली. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीवेळी शिवसेना आणि बंडखोर आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान यांच्यामध्ये वादावादी, घोषणाबाजी झाली. आपल्या माईकवरून समाधान यांनी म्याऊ म्याऊ असा आवाज काढला आणि वातावरण तंग बनले. वास्तविक त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली होती. आमदार सरवणकर त्या ठिकाणी आले आणि पुन्हा दोन्ही बाजूकडून शक्तिप्रदर्शन झाले. प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत गेले आणि त्या ठिकाणी आमदार सरवणकर यांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप झाला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सरवणकर समर्थक युवकाला मारहाण केली आणि त्याची चेन चोरल्याचा आरोप झाला. याप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल झाला. मात्र सरवणकर समर्थकांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही म्हणून शिवसेनानेत्यांनी पोलीस ठाणे गाठले. एका पोलीस कर्मचाऱयाच्या जबाबानुसार सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला तर चोरीस गेलेली चेन तक्रारदार युवकाकडेच सापडल्याने शिवसेना कार्यकर्त्यांना जामीन मिळाला. हेही टाळता आले असते मात्र फारच ताणल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली. भाजप, शिवसेना व बंडखोर यांचे हे कारनामे कमी होते म्हणून कोकणातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एक नवा पराक्रम करून ठेवला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दौऱयावेळी रिफायनरी विरोधक कार्यकर्त्याने नाना पटोले आणि स्थानिक पोलिसांच्या उपस्थितीतच उद्योग मंत्री उदय सामंत यांना जाळून ठार मारण्याची धमकी दिली आहे. कार्यकर्ता धमकी देत असलेला व्हिडिओ समाजमाध्यमातून वेगाने पसरला असून उदय सामंत यांच्याशी चर्चा करून पोलिसांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश जारी केले आहेत. काही दिवसांपूर्वी या भागात एका आमदार महोदयांनी दौरा केला होता आणि त्यावेळी संतप्त जमावाने त्यांना घेराव घालून आपल्या भूमिकेपासून माघार घ्यायला लावली होती. वातावरण तणावपूर्ण असताना अशा गोष्टी बोलणे सुद्धा टाळले पाहिजे. अन्यथा एखादा संतप्त जमाव रागाच्या भरात अतिरेकी कृती करू शकतो. जमावाची मानसिकता हिंसक बनली तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. असे अनेक आंदोलनांमध्ये महाराष्ट्राच्या विविध भागात दिसून आले आहे. कोकणात असे काही घडू नये याची दक्षता घेऊन अशा कार्यकर्त्यांना रोखण्याची जबाबदारी इथल्या पक्षीय नेतृत्वाने पार पाडली पाहिजे. यापूर्वी आमदार भरत गोगावले यांनी राज्यातील सत्तांतराबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असणाऱया दाव्याच्या तारखा पडतच राहणार आणि सरकार आपला अडीच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करणार असे भाकीत केले होते. या वक्तव्यामागील गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने शिंदे गटाकडून खुलासा करण्यात आला होता. मात्र आता नवा वाद निर्माण झाला आहे तो, मुख्यमंत्र्यांसह बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवर न्यायालयात दावा सुरू असताना मुख्यमंत्री सरन्यायाधीशांच्या बरोबर मुंबई उच्च न्यायालयाच्या एका समारंभात उपस्थित राहिल्याच्या घटनेवर. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारच्या वैधतेची सुनावणी सुरू आहे, असे असताना मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत यांच्यासोबत एका व्यासपीठावर बसणे हे संकेताला धरून नाही असे ट्विट केले आहे. शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्र्यांनी या सत्काराला उपस्थित राहणे निकष, नियम आणि कायद्याला धरून नाही आणि याच कारणामुळे लोकशाही धोक्यात आहे, असे आम्ही वारंवार म्हणत आहोत, असे मत मांडले आहे. वास्तविक याबाबत आयोजकांनी खबरदारी घेण्याची गरज होती. मात्र ती घेतली गेली नाही. वास्तविक या प्रकरणांमध्ये घटनापीठाचे न्यायाधीश वेगळे आहेत. मात्र तरीही प्रकरण ज्यांच्या न्यायालयात सुरू आहे त्यांच्या बाबतीत असे बोलले गेल्याने हा एकाच वेळी मुख्यमंत्र्यांवर आक्षेप ठरतो तसाच न्यायालयावर ही ठरतो. हे लक्षात घेतले पाहिजे. असे प्रकार संबंधित सर्वांनाच टाळता आले असते आणि त्याबाबतचे भाष्य करणाऱयांनीही अधिक सौम्य भाषेत याबाबत आक्षेप घेता आला असता, हे लक्षात घेतले पाहिजे.
Previous Articleभारतीय महिला क्रिकेट संघाचे लक्ष सुधारित कामगिरीवर
Next Article इलेक्ट्रीक हायवेचे काम सुरू
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.