पाचवीपर्यंत शाळा बंद ः डिझेलवरील अवजड वाहनांवर बंदी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दरवर्षीप्रमाणे दिवाळीनंतर दिल्लीत प्रदूषणाची पातळी वाढल्याचे दिसून येत आहे. लोकांना श्वास घेणे कठीण झाले आहे. दिल्लीत शुक्रवारी सकाळी एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय) 472 वर पोहोचला. तसेच संपूर्ण दिल्ली दाट धुक्मयाने व्यापली आहे. प्रदूषणाची पातळी वाढल्यानंतर दिल्ली सरकारने सावधगिरीसाठी काही निर्बंध लागू केले आहेत. विशेषतः शाळकरी मुलांची काळजी घेण्याच्या उद्देशाने पुढील काही दिवसांसाठी पाचवीपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच वाहनांच्या संचारावर मर्यादा टाकण्यात आल्या आहेत.
वाढत्या प्रदूषणामुळे नोएडा प्रशासनाने शुक्रवारपासून आठवीपर्यंतच्या मुलांसाठी ऑनलाईन वर्ग घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर दिल्लीतील प्राथमिक शाळा शनिवारपासून बंद राहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत केली. प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. 10 नोव्हेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. खराब हवेमुळे दिल्लीत एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशनने दिल्ली-एनसीआरमध्ये डिझेलवर चालणाऱया वाहनांवर बंदी घातली आहे. मात्र, सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांवर बंदी नाही.
बहुतांश भागात एक्यूआय 400 च्या वर
‘एक्यूआय’ हे हवेच्या गुणवत्तेचे मोजमाप आहे. एक्यूआय 450 च्या वर पोहोचणे अत्यंत गंभीर म्हणजे फुफ्फुसासाठी धोकादायक मानले जाते. सद्यस्थितीत आनंद विहारमध्ये एक्यूआय 473, मुंडकामध्ये 476, वजीरपूरमध्ये 475, नरेलामध्ये 477, जहाँगीरपुरीमध्ये 485, रोहिणीमध्ये 474, विवेक विहारमध्ये 475, आयजीआय विमानतळावर 453 याप्रमाणे प्रदूषणाची पातळी नोंद झाली आहे. तसेच दिल्ली विद्यापीठामध्ये 563 एक्यूआय नोंदवले गेले.
वाहनांचा संचार, शाळांमध्ये कडक नियम
कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंटने ग्रेडेड रिस्पॉन्स ऍक्शन प्लॅनचा चौथा टप्पा लागू केला आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये व्यावसायिक बांधकामांवर बंदी घालण्यात आली आहे. दिल्लीतील पाचवीपर्यंतच्या प्राथमिक शाळा शनिवारपासून बंद राहतील आणि इयत्ता 5 वी वरील इयत्तांसाठी मैदानी खेळ बंद ठेवण्यात येणार आहेत. केंद्रीय पॅनेल एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशनने दिल्ली-एनसीआरमध्ये डिझेल चारचाकी वाहने, ट्रकच्या प्रवेशावर बंदी घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच व्यावसायिक बांधकामांवर बंदी घालण्यात आली आहे. महामार्ग, उड्डाणपूल, वीज पारेषण, ओव्हरब्रिज, पाईपलाईनचे बांधकाम थांबवण्यात आले आहे.
खबरदारीच्या उपाययोजना
नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्ये प्रशासनाने शुक्रवारपासून पहिली ते आठवीच्या मुलांसाठी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आहे. गौतम बुद्ध नगरचे जिल्हा शाळा निरीक्षक धरमवीर सिंग यांनी 9वी ते 12वी पर्यंतचे वर्ग ऑनलाईन चालवण्याचे आदेश दिले आहेत. 8 नोव्हेंबरपर्यंत सर्व शाळांमध्ये खेळ किंवा सभा यासारख्या उपक्रमांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्येत वाढ
वाढत्या प्रदूषणामुळे रुग्णालयांच्या ओपीडीमध्ये श्वसनाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. पूर्वी ओपीडीमध्ये दररोज 20-25 श्वसनाचे रुग्ण येत असत. आता ही संख्या 70-75 झाली आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने दिल्ली सरकारला शाळा बंद करण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक मंडळाच्या सर्वेक्षणानुसार, दिल्ली-एनसीआरमधील शेतांमध्ये होत असलेली जाळपोळ हेच वाढत्या प्रदूषणाचे मुख्य कारण असल्याचे 53 टक्के लोकांचे म्हणणे आहे. 20 हजार लोकांवर केलेल्या सर्वेक्षणात 13 टक्के लोकांनी प्रदूषणासाठी वाहने जबाबदार असल्याचे मानले. त्याचवेळी, 56 टक्के लोक दिल्लीत सम-विषम फॉर्म्युला लागू करण्यास विरोध करत आहेत.