जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचा आदेश
बेळगाव : सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. नद्यांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाहत आहे. बहुतांश नद्यांना पूर आला असून नदीपात्रासह तलावांमध्ये सर्वच प्रकारच्या मासेमारीला निर्बंध घालण्यात आला आहे, असा आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले असून तलाव, जलाशय तुडुंब भरले आहेत. नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. बहुतांश नद्यांना पूर आला आहे. जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. तेथील जलाशयांतून नद्यांना पाणी सोडले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. अशा परिस्थितीत मासेमारी करणे धोक्याचे आहे. यासाठी जिल्ह्यात विविध तालुक्यांत नद्या, जलाशय व तलावांमध्ये मासेमारी करण्यास निर्बंध घालण्यात यावेत, अशा मागणीचे निवदेन मत्स्यपालन खात्याच्या उपनिर्देशकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. यावरून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी नागरिक सुरक्षा कायद्यांतर्गत कोणत्याच प्रकारच्या मासेमारीला परवानगी नसून या स्थितीमध्ये मासेमारी करण्यात येऊ नये, असा आदेश जारी केला आहे.