मुख्यमंत्री बोम्माई यांची घोषणा ः कायद्यात दुरुस्ती करणार
प्रतिनिधी/ बेंगळूर
शेतकरी संकटात असताना बँका जप्ती किंवा नोटीस बजावून कारवाई करतात. याला आळा घालण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करून शेतकऱयांच्या मालमत्ता जप्तीवर निर्बंध घालण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केली आहे.
चित्रदुर्ग येथे मुख्यमंत्री बोम्माई यांनी सिरिगेरे तरळबाळू जगद्गुरु बृहन् मठात आयोजित कार्यक्रमात ही घोषणा केली आहे. राज्यातील शेतकऱयांना 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात येत असले तरी अतिवृष्टी, अनावृष्टीमुळे शेतकरी संकटात आहेत. यंदा उत्तम पाऊस झाला आहे. तळी-तलाव भरले आहेत. मात्र, आर्थिकदृष्टय़ा अडचणीत असलेल्या शेतकऱयांवर बँकांकडून होणारी मालमत्ता जप्तीची कारवाई रोखण्यासाठी कायद्यात दुरुस्ती केली जाणार आहे, असे ते म्हणाले.
आपले सरकार शेतकऱयांच्या हितरक्षणासाठी कटिबद्ध आहे. कायद्यातील दुरुस्तीमुळे शेतकऱयांना कर्जफेडीसाठी संधी मिळणार आहे. आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर शेतकऱयांच्या मुलांसाठी निधीची तरतूद केली. 14 लाख शेतकऱयांच्या मुलांना ‘विद्यानिधी’ दिला आहे. बालकामगार, विणकर, मच्छीमार, ऑटोरिक्षा चालक आणि टॅक्सीचालकांच्या मुलांसाठीही या योजनेचा विस्तार करण्यात आला आहे. शिक्षणातून रोजगार मिळावा हा यामागचा उद्देश आहे. राज्यातील मुलांचे पैशांअभावी शिक्षण थांबू नये. त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, यासाठीच विद्यानिधी योजना जारी करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.