पुणे / प्रतिनिधी :
शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीचा निकाल 24 मार्चदरम्यान जाहीर करण्याचे नियोजन आहे. मात्र, तांत्रिक कारणास्तव काही बदल झाल्यास संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.
राज्यात शिक्षकांच्या 30 हजार रिक्त जागांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यासाठी राज्य परीक्षा परिषदेने आयबीपीएसच्या माध्यमातून 22 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी ऑनलाइन पद्धतीने घेतली होती. या परीक्षेसाठी राज्यभरातील 2 लाख 40 हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती. परीक्षा झाल्यानंतर निकाल कधी जाहीर होणार, असा प्रश्न उमेदवारांकडून विचारण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर निकालाच्या तारखेचा अंदाज उमेदवारांना येण्यासाठी संकेतस्थळावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यानुसार शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीचा निकाल 24 मार्चच्या दरम्यान जाहीर करण्याचे नियोजन आहे. मात्र तांत्रिक कारणास्तव काही बदल झाल्यास निकाल संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
अधिक वाचा : पुण्यात ‘H3N2’चा पहिला बळी