गेल्या 12 जूनला पश्चिम बंगालमधून 70 वर्षांचे एक वयोवृद्ध गृहस्थ उत्तर प्रदेशात वृंदावन येथे बेपत्ता झाले होते. वृंदावन हे भगवान श्रीकृष्णांचे जन्मस्थान मानण्यात येते. कृष्णजन्मस्थानाचे दर्शन घेण्याची ओढ या वृद्ध गृहस्थांनी जन्मभर बाळगली होती. अखेरीस वयाच्या 70 व्या वषी त्यांना ही संधी मिळाली होती. मात्र, वृंदावनमध्ये आल्यानंतर ते परतीचा मार्ग विसरून गेले. आपण कोठून आलो आणि आपल्याला परत कोठे जायचे आहे, यासंबंधीची त्यांची स्मृतीच नाहीशी झाली. त्यामुळे वृंदावनच्या परिसरातच ते दोन महिने भटकत राहिले.
भटकत भटकत ते वृंदावनहून आग्रा शहरात पोहोचले. आग्य्रातील असहय़ उन्हाळय़ामुळे त्यांची प्रकृती बिघडली. लोक त्यांना भिकारी समजत होते. त्यामुळे कोणीही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. जी काही भीक मिळेल, त्यावर त्यांची कशीबशी गुजराण होत होती. त्यांना बंगाली सोडून कुठलीही भाषा येत नसल्यामुळे आपल्या अडचणी ते सांगूही शकत नव्हते. साधारणतः सात आठवडय़ांनंतर पोलिसांनी त्यांना बेवारस समजून ताब्यात घेतले आणि सरकारी रुग्णालयात भरती केले. सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांची विचारपूस केली. ते कोणत्या तरी राहत्या घरातील आहेत, असे साधारण अनुमान डॉक्टरांनी काढले. या गृहस्थांजवळ कुठले ओळखपत्रही नव्हते. त्यामुळे ते नेमके कोठून आले आहेत, हे शोधणे अवघड होते. त्यांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली, पण कोणाचाही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर डॉक्टरांच्या प्रयत्नाने दोन महिन्यांनंतर त्यांचे मूळ वसतीस्थान सापडले. त्यांना त्यांच्या घरी पोहोचविण्यात आल्यानंतर त्यांची स्मरणशक्ती पुन्हा जागृत झाली आणि त्यांनी आपल्या माणसांना ओळखले. अशाप्रकारे सजग आणि संवेदनशील डॉक्टरांमुळे त्यांना आपले कुटुंब परत मिळाले. याबद्दल साश्रू नयनांनी त्यांनी डॉक्टरांचे आभार मानले. त्यांना शोधण्यामध्ये गुगल या माध्यमाचाही मोठा उपयोग झाला, असे त्यांच्यासाठी प्रयत्न केलेल्या डॉक्टरांनी सांगितले. या वृद्धाचे नाव पारिस आदक असे असल्याचे सांगण्यात आले आहे.