केंद्रीय गृहमंत्र्यांकडून उच्चस्तरीय बैठक
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी उच्चस्तरीय बैठक घेत अमरनथा यात्रेच्या सुरक्षा तयारींचा आढावा घेतला आहे. दोन वर्षांनी ही वार्षिक तीर्थयात्रा 30 जूनपासून सुरू होणार आहे. यावर्षी सुमारे 3 लाख भाविक या यात्रेत सामील होत आहेत. केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांनी अलिकडेच या मुद्दय़ावर बैठक घेतली होती.
गृहसचिवांकडून 13 मे रोजी दिल्लीत तर दुसरी 15 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमध्ये बैठक घेण्यात आली आहे. बैठकीत सामील होणाऱयांमध्ये जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, इंटेलिजेन्स ब्युरो चीफ अरविंद कुमार, सीआरपीएफ महासंचालक कुलदीप सिंह, जम्मू-काश्मीर पोलीस महासंचालक दिलबाग सिंह, लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी आणि बीएसएफ तसेच आयटीबीपी आणि केंद्रीय गृह मंत्रालयाचे अनेक अधिकाऱयांचा समावेश आहे. तसेच अमरनाथ श्राइन बोर्डाच्या सदस्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत भाग घेतला आहे.
बैठकीत अमित शाह यांना सुरक्षा विषयक सर्व मुद्दे तसच यात्रामार्गातील भागामधील स्थितीची कल्पना देण्यात आली. जम्मू-काश्मीरमध्ये मागील काही महिन्यांपासून दहशतवाद्यांकडून होणाऱया टार्गेट किलिंगच्या घटना वाढल्याने अमरनाथ यात्रेकरता मोठी सुरक्षा व्यवस्था करावी लागणार आहे. याचमुळे गृह मंत्रालयाने जम्मू-काश्मीरमध्ये तैनात सुरक्षा यंत्रणांना सतर्क करत दहशतवादविरोधी मोहिमेला वेग देण्याचा निर्देश दिला आहे.
या यात्रेसाठी ऑनलाईन नोंदणी 11 एप्रिलपासून सुरू झाली आहे. अमरनाथ यात्रा 30 जूनपासून 11 ऑगस्टपर्यंत चालणर आहे. अमरनाथ श्राइन बोडाच्या सदस्यांशी विचारविनिमय केल्यावर जम्मू-काश्मीर प्रशासनाने कोरोना महामारीमुळे 2020 आणि 2021 मध्ये ही यात्रा रद्द केली होती. 3880 मीटर उंचीवरील गुहेपर्यंत पोहोचण्यासाठी पहलगाम आणि बालटालचा मार्ग स्वीकारला जातो.