खरीप हंगाम समाधानकारक, शेतकऱ्यांना पावसाची चांगली साथ : सरासरीपेक्षा 100 मि. मी. अधिक पावसाची नोंद : मशागतीची कामे पूर्ण
खानापूर : तालुक्यात यावर्षी पावसाने दमदार सुरुवात केली आहे. जुलै महिन्याच्या 15 तारखेपर्यंत सरासरी गाठली असून आतापर्यंत पावसाने सरासरीपेक्षा शंभर मि. मी. पाऊस जास्त झाल्याची नोंद झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून पाऊस संततधार सुरू असून तालुक्यातील नदी, नाले पुन्हा ओसंडून वाहत आहेत. सततच्या होणाऱ्या पावसामुळे नदी-नाल्यांच्या पातळीत चढउतार होत आहे. होत असलेला पाऊस हा समाधानकारक होत असल्याने शेतकऱ्यांतून आनंद व्यक्त होत आहे.
यावर्षी पावसाने शेतकऱ्यांना चांगली साथ दिल्याने खरीपाच्या पेरण्या चांगल्या झाल्या असून आतापर्यंत तालुक्यात खरीप पेरणी हंगाम शेतकऱ्यांनी साधला असून आतापर्यंत 24000 हेक्टर जमिनीवर भात पेरणी करण्यात आली आहे. तर 19 हजार हेक्टरवर उसाची लागवड करण्यात आली आहे. त्यासह इतर क्षेत्रावर बाजरी, रताळी, कापूस, भुईमूग, सोयाबीन ही पिके घेण्यात येत आहेत. यावर्षी पावसाने शेतकऱ्यांना चांगला हंगाम दिला असून पेरण्या आणि इतर मशागतीची कामे सुरळीत पार पडली आहेत.
आतापर्यंत पिकांची परिस्थिती उत्तम असून याच पद्धतीने पावसाने साथ दिल्यास खरीप हंगाम चांगला होण्याची आशा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. गेल्यावर्षी पावसाने हात दिल्याने दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला होता. मात्र यावर्षी गेल्या दीड महिन्यापासून पावसाने चांगली साथ दिल्याने खरीपाच्या पिकांची पेरणी आणि उगवण चांगली झाली आहे.तसेच सतत पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्नही मिटलेला आहे.
जनावरेही आता हिरव्या चाऱ्यावर पोसली जात आहेत. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. तालुक्यात 18 हजार हेक्टरवर ऊस पीक घेण्यात येते. ऊस पिकासाठीही हे वातावरण पोषक निर्माण झाले आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात 1000 हेक्टरवर रताळ्याची लागवड केली जाते. तर पूर्वेकडील गावातून कापूस, सोयाबीन लागवड केली जाते. मात्र तालुक्यात प्रमुख पीक म्हणून भात आणि उसाची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे.
जंगली जनावरांच्या त्रासामुळे पश्चिम आणि दक्षिण भागातील शेतकऱ्यांनी भुईमूग पीक घेणे अलीकडच्या काळात बंद केले आहे. मात्र पूर्व भागात भुईमूगाचे उत्पादन काही शेतकरी घेत आहेत. पश्चिम भागात अद्याप भाताची रोप लागवड (नट्टी) चे काम अंतिम टप्प्यात आले असून येत्या आठवड्यात रोप लागवडीचे काम संपणार आहे. आतापर्यंत पावसाने शेतकऱ्यांना चांगली साथ दिल्याने पिकांच्या मशागतीची कामेही शेतकऱ्यांनी आटोपली आहेत.