जनतेने दिली माहिती : अधिकाऱयाच्या नावे पावती
प्रतिनिधी /बेळगाव
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सोने, चांदी, अमलीपदार्थांची मोठय़ा प्रमाणात तस्करी होते. काहीवेळा पोलिसांना चुकवून तर आणखी काहीवेळा आर्थिक समझोत्यातून गुन्हेगार आपला धंदा बिनबोभाट करत असतात. रेशन तांदळाचा काळाबाजारही महामार्गावरच चालतो. शनिवारी रात्री काकती पोलिसांनी महाराष्ट्रात रेशन तांदूळ नेणारे दोन ट्रक जप्त केले आहेत.
काकती पोलिसांनी मोठय़ा धाडसाने ही कारवाई केल्याची सर्वत्र चर्चा सुरू असली तरी कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तांदूळ तस्करीची माहिती पुरविली आहे. त्यामुळे या प्रकरणात काकती पोलिसांचे धाडस ते कसले? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अनेक पोलीस अधिकारी आपल्या कर्तृत्वाने जनमानसात वेगळय़ा अर्थाने चर्चेचा विषय बनत आहेत.
शनिवारी रात्री तांदूळ वाहतूक करणारे दोन ट्रक पकडण्यात आले तरी रविवारी रात्रीपर्यंत पोलीस मुख्यालयातून किंवा काकती पोलिसांकडून याविषयी कसलीच माहिती दिली गेली नाही. काकती पोलीस निरीक्षक गुरुनाथ यांच्याशी संपर्क साधला असता नेहमीप्रमाणे त्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही. एवढेच नाही तर फोन स्वीकारण्याचे सौजन्यही दाखविले नाही. या कारवाईच्या श्रेयाची पावती मात्र ते स्वतःच्या नावे फाडत आहेत.
दोघांना अटक
या प्रकरणी महंम्मद हुसेन हुलगूर (वय 34) रा. हुबळी, ख्वाजा मैनुद्दीन बण्णूर (वय 30) रा. जुनी हुबळी या दोघा जणांना अटक करण्यात आली असून दोन ट्रकमधील प्रत्येकी 50 किलो तांदळाची 600 पोती जप्त करण्यात आली आहेत. यासंबंधी रविवारी रात्रीपर्यंत पोलीस दलाकडून कसलीच अधिकृत माहिती दिली गेली नाही. महामार्गावर अनेक प्रकारच्या तस्करी चालतात. याची माहिती काकती पोलिसांना कशी मिळत नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात असून ही कारवाई काकतीच्या पोलीस निरीक्षकांनी केली की कन्नड संघटनेच्या पदाधिकाऱयांनी दिलेल्या माहितीवरून 112 वाहनातील पोलिसांनी केली? याविषयी जनतेत जोरदार चर्चा रंगली आहे.
दोन ट्रकमधील तांदूळ जप्त
उपलब्ध माहितीनुसार एका कन्नड संघटनेच्या पदाधिकाऱयांनी 112 या क्रमांकावर संपर्क साधून बेकायदा तांदूळ तस्करीची माहिती दिली आहे. त्यानंतर काकती पोलिसांचे एक वाहन तेथे पोहोचले. पोलिसांनी दोन्ही ट्रक अडवून पोलीस स्थानकात नेले. अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱयांनी ट्रकमधील तांदूळ रेशनचाच असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर तो जप्त करण्यात आला.