पालकमंत्री दीपक केसरकर : करवीर निवासिनी अंबाबाईचे घेतले दर्शन : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा
प्रतिनिधी/कोल्हापूर
नवरात्रोत्सव काळात करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी सुमारे 25 लाख भाविक करवीर नगरीत दाखल होतील, असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी 12 ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था केली आहे. एसटीची व्यवस्था केली आहे. तसेच दर दहा मिनिटाला केएमटीची सेवाही देण्याचेही नियोजन आहे. त्याचबरोबर रिक्षा असोसिएशनशी चर्चा करून शासनाच्या खर्चाने भाविकांना रिक्षा सेवा पुरविणार असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
कोल्हापुरच्या संपर्क दौल्यावर असलेले जिल्ह्य़ाचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी सकाळी अंबाबाई आणि श्रीक्षेत्र जोतिबाचे दर्शन घेतले. अंबाबाई मंदिराच्या आवारात त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जिल्हा नियोजन समिती, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांची धावती भेट घेत नवरात्रौत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी खासदार धैर्यशील माने उपस्थित होते.
हे ही वाचा : शारदीय नवरात्रौत्सवाला आरंभ
पालकमंत्री केसरकर म्हणाले, नवरात्रोत्सव काळात कोल्हापुरात येणाऱया भाविकांसाठी मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी मार्गदर्शक पुस्तिका काढण्यात येणार आहे. त्याची छपाई तात्काळ पूर्ण करण्यात येईल. भाविक, देवस्थान समिती, महानगरपालिका, पोलीस प्रशासन यांच्या सहकार्याने नवरात्र उत्सव निर्विघ्नपणे पार पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली. पूर्वतयारी पूर्ण झाली असून सुविधा कमी पडणार नाहीत, मात्र भाविकांनी रांगेतून दर्शन घ्यावे असेही आवाहन केले.
बहुमजली स्वच्छतागृहासाठी प्रयत्न
कोल्हापुरात येणाऱया भाविकांसाठी सध्या तात्पुरत्या स्वरुपात स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात येईल. जागेची उपलब्धता होताच तीनमजली स्वच्छतागृह आणि स्नानगृहासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. यामध्ये स्त्राr-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था असेल, असे केसरकर यांनी सांगितले.
कोल्हापुरातील वारसास्थळांची जपणूक करणार
कोल्हापुरात जयपूरच्या धर्तीवर पर्यटन विकास करणार असून चंदगडपासून पन्हाळ्यापर्यंत पर्यटकांचा ओघ वाढेल यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. कोल्हापुरातील अनेक शासकीय कार्यालये, शाळा या हेरिटेज वास्तूंमध्ये आहेत. यासाठी हेरिटेज वॉकचे आयोजन करणार असून हब तयार करून कोल्हापूरचे वैभव जपण्यासाठी नियोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अंबाबाई मंदिरापासून न्यू पॅलेसपर्यंत, शिवाजी पूल, रंकाळासारख्या तलावांच्या काठावर विद्युत रोषणाई करण्यात येणार असल्याचेही मंत्री केसरकर यांनी सांगितले.