भारतात प्रतिभावंत लोकांची कोणतीही कमतरता नाही आहे. अगदी गावागावांमधून अशा व्यक्ती आढळून येतात. त्यांना संधी मिळताच त्या असेल तशा परिस्थितीत आपले कौशल्य आणि क्षमता सिद्ध करतात. कित्येक अशा प्रतिभावंतांना संधी प्राप्त न झाल्याने समाज त्यांच्या क्षमतांना मुकतो. अशा व्यक्ती मग काहीवेळा निरुपयोगी ठिकाणी आपली असामान्य क्षमता व्यक्त करुन स्वतःचे समाधान करुन घेतात. इतर लोकही त्यामुळे आचंबित होतात.
सध्या सोशल मिडियावर अशा एका व्यक्तीचा व्हिडीओ प्रसारित केला जात आहे. ही व्यक्ती एकाचवेळी दोन सायकलींवर स्वार होऊन गावाच्या गल्लीगल्लीतून फिरताना दिसते. त्याला कोणीही एकदाही एका सायकलवर स्वार होऊन प्रवास करताना पाहिलेले नाही. नेहमीच तो दोन सायकलींवर दिसतो. परिणामी, पंचक्रोशीत तो चर्चेचा विषय बनला आहे. त्याचे हे अफलातून कसब कौतुकाचा विषय बनले आहे. मात्र, कित्येकजण अशीही चर्चा करतात की, त्याचे हे कौशल्य नेमके कशासाठी आहे ? त्याने कोणाचा काय लाभ होणार आहे ? पण हे प्रश्न गैरलागू असल्याचेही अनेकांचे मत आहे. कारण अशा अनेक बाबी आहेत की ज्या केवळ स्टंट म्हणूनच केल्या जातात. त्यांच्या नफ्यातोटय़ाचा विचार केला जात नाही.
ही व्यक्ती केवळ सायकल चालवते असे नव्हे. तर दोन सायकलींचे बरेच कसरतीचे प्रकारही तिला अवगत आहेत. भर रस्त्यात तिच्या या कसरती चाललेल्या असतात. या व्यक्तीला जर योग्य प्रशिक्षण मिळाले असते, तर ऑलिंपिक किंवा तत्सम स्पर्धांमध्ये भाग घेऊन या व्यक्तीने देशाचे नाव अधिकच उज्ज्वल केले असते, असेही अनेकांचे प्रामाणिक मत आहे.