महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2022 मध्ये घेतलेल्या 12वी परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाले. गेल्या 10 वर्षांची परंपरा जपत कोकण विभागाने सलग 11व्या वर्षी आपला अव्वल क्रमांक कायम राखला आहे. कोविड महामारीमुळे निर्माण झालेल्या विविध भौतिक, शारीरिक, मानसिक अडथळ्यावर मात करत यशाचा आलेख कायम राखण्याचे काम निश्चितच गौरवास्पद आहे.
2022च्या निकालामध्ये मुंबई व पुणे विभाग अन्य विभागांच्या मानाने कमालीचे पिछाडीला पडलेले दिसतात. महानगरांमध्ये तुलनेने अधिक काळ बंद राहिलेल्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालये व प्रदीर्घ निर्बंध यामुळे विद्यार्थी दीर्घकाळ शिक्षण प्रवाहाबाहेर राहिल्याचा हा परिणाम आहे, हे स्पष्टपणे जाणवते. अर्थात कोविडमुळे निर्माण झालेल्या समस्यांमधून कोणताही विभाग सुटलेला नाही. कोकण विभागही त्याला अपवाद नाही. महानगरांच्या मानाने कोकणातील समस्या कमी असल्या तरीही प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर कोकणात होणारे (तुलनात्मक दृष्टय़ा) चांगले कार्य हे या सातत्यपूर्ण यशाचे गमक आहे, हे स्वीकारावेच लागेल.
कोकण विभागात यावर्षी 29413 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले. त्यापैकी 28595 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेचे हे प्रमाण 97.21 टक्के आहे. गतवर्षी हाच निकाल 99.63 टक्के होता. मात्र त्यावेळी मूल्यमापनाची वेगळी पध्दत वापरली गेली होती. कोरोनाच्या विळख्यापूर्वी 2020 साली कोकण विभागाचा बारावीचा निकाल 95.84 टक्के होता. 2021 हे वर्ष असामान्य परिस्थितीत झालेले शैक्षणिक कामकाज आणि परीक्षा यामुळे तुलनेसाठी विचारात घेणे योग्य नाही. त्यामुळे 2020 च्या निकालाशी तुलना करता यावर्षी विशेष योग्यता प्राप्त करणाऱया मुलांचे प्रमाण सुमारे सव्वा टक्क्याने वाढले आहे. तर प्रथम श्रेणीतील विद्यार्थ्यांच्या प्रमाणातही साडेतीन टक्क्यांपेक्षा अधिक वृध्दी झालेली दिसते. ही देखील कौतुकास्पद कामगिरीच म्हणावी लागेल. यावर्षी 8.18 टक्के विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत तर 37.93 टक्के विद्यार्थी प्रथम श्रेणीत पुढे गेले आहेत. द्वितीय शेणीमध्ये 2020 साली 48.68 टक्के विद्यार्थी होते ते प्रमाण घटून 45.12 टक्क्यांवर आले आहे. सुमारे तेवढीच वाढ प्रथम श्रेणीच्या विद्यार्थ्यांमध्ये झाली आहे. तृतीय श्रेणीतील विद्यार्थ्यांची संख्या मात्र काहिशी वाढली आहे. त्यावर शाळा नव्या शैक्षणिक वर्षात नक्की विचार करतील याची खात्री वाटते.
कोकण 12वीच्या निकालात अव्वल ठरले आहे. कला, वाणिज्य, कौशल्याधारित अभ्यासक्रम या तिनही शाखांमध्ये कोकण आघाडीवर आहे. मात्र विज्ञान शाखेत नागपूर, कोल्हापूर आणि अमरावती विभाग कोकणापेक्षा चांगलेच पुढे आहेत. हा देखील भविष्यकालीन वाटचालीत लक्ष देता येईल असा एक घटक आहे, असे वाटते.
कोकण विभागातील निकालाकडे पाहिल्यावर आणखी एक बाब लक्षात येते ती म्हणजे कोविड काळात झालेल्या बदलांचा सर्वाधिक फटका शहरी भागातील शिक्षण व्यवस्थेला अधिक बसला. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यातील सुमारे दीडशे कनिष्ठ महाविद्यालयांपैकी 100हून अधिक विद्यालयांचे निकाल 100 टक्के लागले आहेत. यामध्ये सर्वाधिक महाविद्यालये ग्रामीण भागातील आहेत. शहरी भागातील विद्यार्थीसंख्या आणि विशेषतः वाहतूक व्यवस्थेअभावी शाळेपासून दूर रहावे लागलेल्या विद्यार्थ्यांची अधिक असलेली संख्या याला कारणीभूत मानली जाते. येथील ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागात नेटवर्क उपलब्धतेची अडचण विद्यार्थ्यांना सहन करावी लागली. शाळेत जाता येत नाही आणि ऑनलाईन शिक्षणाचाही लाभ घेता येत नाही अशा दुहेरी संकटात येथील विद्यार्थी भरडून निघाला. शाळा व शिक्षकांनी ऑनलाईन अध्यापनाचे तंत्र आत्मसात करण्यापासून सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्याचेही फलित निकालाच्या माध्यमातून मिळाल्याचे दिसते.
मुळातच गेली काही वर्षे विविध सर्वेक्षणामध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील शिक्षण अन्य जिह्यांच्या तुलनेने वरच्या स्तरावर असलेले आढळून आले आहे. त्याचाच परिणाम दहावी आणि बारावीच्या निकालामध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रतिबिंबीत होतो, असे या क्षेत्रातील अभ्यासकांचे मत आहे. भाषा आणि गणित यांचा पायाभूत टप्प्यांवर होणारा विकास पुढील टप्प्यांतील यशाचा मूलाधार बनत आहे, हे यावरून स्पष्ट होते. मुले 10 वी किंवा 12वीला गेल्यावर वर्षभर चाचण्या, सराव आदींच्या भडिमारातून तत्कालिक यशाचे ‘पॅटर्न’ याचमुळे गेली सलग 11 वर्षे पिछाडीवर पडल्याचे दिसते. यातून एक वेगळा ‘कोकण पॅटर्न’ आपोआपच निर्माण झाला आहे. यावर अभ्यासकांनी सखोल चिंतन करून त्याला ‘पॅटर्न’च्या स्वरूपात शास्त्रीय पध्दतीने मांडण्याची गरज आहे.
सध्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री याच लाल मातीचे सुपुत्र असल्याने त्यांच्या अखत्यारीतील काही शैक्षणिक संधी येथे उपलब्ध होऊ लागल्या आहेत. यामध्ये भर पडण्यासह अस्तित्वात असलेल्या संस्थांच्या दर्जावाढीसाठी शासकीय आणि राजकीय स्तरावर प्रयत्न सुकर होण्याची अपेक्षा आहे. कोकणामध्ये शिक्षणाला पूरक वातावरण नेहमीच लाभले आहे. मात्र शाळांतील व शिक्षण विभागातील वाढत्या रिक्त पदांची संख्या कमी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने विशेष लक्ष देण्याची नितांत गरज आहे. यातूनच या वाटचालीला गती प्राप्त होणार आहे.
10वी 12वीच्या निकालामध्ये अव्वल येणारे कोकण स्पर्धा परीक्षांमध्ये मागे असल्याबद्दल सातत्याने खंत व्यक्त केली जात होती. नजीकच्या काळात सीईटी, नीट जेईई सारख्या परीक्षेला प्रविष्ट होणाऱया आणि त्यामध्ये चांगले यश मिळविणाऱया विद्यार्थ्यांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. त्यासाठीचे मार्गदर्शनही कोकणातच उपलब्ध होऊ लागल्याचा व महाविद्यालयांच्या या भागातील वाढत्या संख्येचा हा परिणाम म्हणावा लागेल. शालेय स्तरावर विविध शिष्यवृत्ती परीक्षांचे आयोजनही याला सहाय्यभूत होत आहे. सीए, एमपीएससी, युपीएससी परीक्षांसह विविध खात्यांच्या पात्रता परीक्षांसाठी प्रयत्न करणाऱया उमेदवारांची संख्याही वाढत आहे. एकंदरीत शैक्षणिक क्षेत्रातील कोकणची ही आगेकूच आश्वासक म्हटली पाहिजे.
विश्वेश जोशी