राज्यपालांनी म्हादईच्या मुद्यावर बोलण्याची मागणी
प्रतिनिधी /पणजी
गोव्याची म्हादई नदी ही अस्मिता आहे. गोव्याची जीवनदायिनी असल्याने राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी प्रथम म्हादईच्या मुद्यावर बोलावे आणि मगच अभिभाषण पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी करताच इतर विरोधी आमदारांनी सहमती दर्शवत म्हादईच्या मुद्यावरून ‘आमची म्हादय, आमका जाय’ अशा घोषणा देत व हातात फलक घेऊन सभागृहात गोंधळ घातला.
सरकारच्या नाकर्तेपणामुळे म्हादई नदीवर कर्नाटक दावा करीत असून, म्हादईवर संकट आल्याने पहिल्यांदा हा प्रश्न हाती घ्या, अशी मागणी विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी राज्यपाल पिल्लई यांच्यासमोर केली. विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातल्याने विधानसभेत पहिल्याच दिवशी गदारोळ झाला. काळे कपडे परिधान करून आणि हातात बॅनर घेऊन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, काँग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्टा, कार्लुस फरेरा, गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई, आपचे आमदार व्हेंझी व्हीएगस, क्रुझ सिल्वा यांनी सरकारचा निषेध व्यक्त केला.
आमदारांनी गदारोळ सुरू केल्यानंतरही राज्यपाल पिल्लई यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. त्यामुळे विरोधी आमदारांनी सभापती रमेश तवडकर यांच्या हौद्याजवळ घोषणाबाजी केली. सभापती तवडकर यांनी वारंवार विनंती करूनही विरोधक आपल्या मतावर ठाम राहिल्याने त्यांनी मार्शलना या सदस्यांना सभागृहाबाहेर काढण्याची सूचना केली. त्यानंतर विरोधी पक्षाच्या आमदारांनी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकून सभागृहातून सभात्याग केला.
विरोधकांकडून राज्यपालांचा अनादर : मुख्यमंत्री
विरोधकांनी राज्यपालांच्या भाषणात व्यत्यय आणून त्यांचा अनादर केला, असा आरोप मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला. “यापूर्वी सभागृहाने विरोधकांकडून असे वागणे कधीही अनुभवले नाही. ते राज्यपालांचे अभिभाषण होते. मुख्यमंत्र्यांचे भाषण नाही,” असे सावंत म्हणाले. विरोधकांनी राज्यपालांच्या भाषणावेळी जो गोंधळ घातला त्यातून राज्यपालांचा अनादर केल्याचे स्पष्ट होते, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.