टॉमेटो शंभरी पार करुन पोहोचला रु. 120 वर!
प्रतिनिधी /पणजी
सध्या पडत असलेल्या अवेळी पावसामुळे अनेक पिकांचे नुकसान होत आहे. यात खास करून भाज्यांचे नुकसान झाले असल्याने बाजारपेठेत भाज्यांचे दर वाढले आहेत. टॉमटोच्या दरात तर दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. मागील आठवडय़ात 60 रुपये किलो दरात विकला जाणारा टॉमेटो आता 100 रूपये किलोने विकला जात आहे.
भाज्यांचे दर वाढल्यामुळे सामान्यांचे बजेट कोलमडले आहे. गाजर 60 रूपये किलो, हिरवी मिरची 80 रूपये किलो या दराने विकली जात आहे. सामान्यांची जवळची भाजी कोबीचेसुद्धा दर वाढत आहेत. मागील आठवडय़ात 20 रूपये प्रति किलो दराने विकला जाणारा कोबी सध्या 30 रूपये प्रति किलो दराने विकला जात आहे.
वालपापडी काहीशी उतरली
टॉमेटोचे दर वाढण्यापूर्वी वालपापडी बाजारपेठेत भाव खात होती. परंतु आता वालपापडीचे दर काही प्रमाणात कमी झालेले दिसून येत आहेत. मागील आठवडय़ात 120 रूपये किलो दराने विकली जाणारी वालपापडी आता 80 रूपये किलो दराने विकली जात आहे.
सध्या कांदा 40 रूपये किलो, बटाटे 30 रूपये किलो, बीट 40 रूपये किलो, भेंडी 60 रूपये किलो, गाजर 80 रूपये किलो, सिमला मिरची 60 रूपये किलो, कोथींबिर 20 रूपये जुडी, लसूण 120 रूपये किलो दराने विकले जात आहे.
फलोत्पादनात दर कमी
फलोत्पादन महामंडळाच्या दालनावर टॉमेटो 75 रूपये किलो या दराने विकला जात आहे. टॉमेटोसोबत इतर भाज्यांचेही दर काही प्रमाणात कमी असल्यामुळे जास्ततः ग्राहक फलोत्पादनाच्या दालनातून भाजी खरेदी करण्याला पसंती देत आहेत. फलोत्पादन महामंडळाच्या दालनावर कांदा 18 रूपये प्रति किलो, बटाटा 29 रुपये तर टॉमेटो 75 रूपये किलो आहे. कोबी 21 रूपये, फ्लॉवर 30 रूपये, भेंडी 26 रूपये. गाजर 25 रूपये, चिटकी 26रूपये, वालपापडी 75 रूपये, हिरवी मिरची 30 रूपये, कोथिंबीर 15 रूपये या दराने भाज्या विकल्या जात आहेत.
आंब्याच्या दारांत उतरण
मान्सूनपूर्व पावसामुळे मानुकराद आंब्याच्या दरात प्रचंड घसरण झाली आहे. सध्या बाजारात उत्कृष्ट दर्जाचे मानकुराद आंबे 350 ते 500 या दरात विकले जात आहेत तर लहान आंबे 200 ते 300 या दरात विकले जात आहेत. सध्या मानकुराद आंब्याची आवक जास्त असली तरी आंब्याची मागणी कमी झाली आहे. आंबे कुजण्याचे प्रमाणही वाढले आहे. आंबे स्वस्त असले तरी ग्राहक आंबे खरेदी करण्याकरिता अल्प प्रतिसाद देत असल्याचे एका आंबे विक्रेत्याने सांगितले.