आशिया चषक सुपर-4 फेरीत पाकिस्तानचा 5 गडी राखून दे धक्का
दुबई / वृत्तसंस्था
टॅक्टिकली सुपेरियर खेळावर भर देणाऱया पाकिस्तानने आशिया चषक स्पर्धेच्या सुपर-4 फेरीतील पहिल्या लढतीत भारताचा 5 गडी राखून एकतर्फी फडशा पाडत एकच खळबळ उडवून दिली. विजयासाठी 182 धावांचे आव्हान असताना दुखापतीशी झुंजणाऱया मोहम्मद रिझवानने 51 चेंडूत 71 तर मोहम्मद नवाझने अवघ्या 20 चेंडूत 42 धावांची आतषबाजी केली आणि हाच या सामन्यातील टर्निंग पॉईंट ठरला.
यापूर्वी साखळी फेरीत पाकिस्तानचा थाटात फडशा पाडला असल्याने भारतीय संघाकडून येथेही ब्लॉकबस्टर विजयाची अपेक्षा गैर ठरत नव्हती. पण, प्रत्यक्षात फलंदाजी, गोलंदाजीच नव्हे तर क्षेत्ररक्षणातही भारताची कामगिरी अगदीच निराशाजनक ठरली आणि त्यानंतर अपयशाला सामोरे जावे लागणे ही निव्वळ औपचारिकता होती.
शेवटच्या 2 षटकात 26 धावांचे संरक्षण करण्याचे आव्हान असताना रोहितने अर्शदीपचे षटक मागे ठेवत भुवनेश्वरला पाचारण केले. पण, पाकिस्तानच्या फलंदाजांनी याच षटकात 19 धावांची आतषबाजी करत सामना आपल्या बाजूने झुकवला. नंतर अर्शदीपच्या शेवटच्या षटकात एका चेंडूचा खेळ बाकी राखत त्यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले.
विराटचे अर्धशतक
तत्पूर्वी, भारतीय आघाडीवीरांनी आपली क्षमता दाखवून दिल्यानंतर भारताने या लढतीत 20 षटकात 7 बाद 181 धावांपर्यंत मजल मारली होती. कर्णधार रोहित शर्मा (28) व केएल राहुल (28) यांनी पॉवर प्लेमध्ये उत्तम फटकेबाजी केली. विराट कोहलीचे झुंझार अर्धशतक आणि केएल राहुल-रोहित शर्माच्या 54 धावांच्या फ्लाईंग स्टार्टच्या बळावर भारताने आशिया चषक स्पर्धेतील पहिल्या सुपर-4 सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 20 षटकात 7 बाद 181 धावांची मजल मारली. विराटने 44 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारांसह 60 धावांची आतषबाजी केली तर केएल राहुल व रोहित यांनी प्रत्येकी 28 धावांचे योगदान दिले. केएल राहुलने 20 चेंडूत 1 चौकार व 2 षटकार तर रोहितने 16 चेंडूत 3 चौकार व 2 षटकार फटकावले.
सेट झाल्यानंतर रोहित शर्माने रौफच्या गोलंदाजीवर खुशदिलकडे सोपा झेल दिला. खुशदिल व फखर झमान यांच्यात गोंधळ उडाला असला तरी खुशदिलने यशस्वीरित्या झेल पूर्ण केला. त्यानंतर लगोलग केएल राहुल देखील शदाबला पुढे सरसावून उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात लाँगऑनवर तैनात नवाझकडे सोपा झेल देऊन तंबूत परतला. अलीकडे उत्तम बहरात असलेल्या सूर्यकुमार यादवचे (10 चेंडूत 13) स्वस्तात बाद होणे धक्कादायक ठरले. त्याने नवाझच्या गोलंदाजीवर स्क्वेअर लेगकडे असिफ अलीला सोपा झेल दिला.
हार्दिक पंडय़ा (2 चेंडूत 0) व रिषभ पंत (12 चेंडूत 14) फार काळ तग धरु शकले नाहीत आणि पडझड सुरुच राहिली. दुसऱया बाजूने विराट कोहलीने मात्र फलंदाजीत कमालीचे सातत्य राखले. 14 चेंडूत 16 धावा फटकावणाऱया दीपक हुडाचा यष्टीरक्षक रिझवानच्या डोक्यावरुन मारलेला अपर कटचा चौकार विशेष प्रेक्षणीय ठरला. शेवटच्या षटकात चौथ्या चेंडूवर धावबाद झालेल्या विराटला रौफने त्या षटकात जखडून ठेवले. पण, बिश्नोईने शेवटच्या 2 चेंडूंवर 2 चौकार फटकावत नाबाद 8 धावा केल्या. पाकिस्तानतर्फे शदाबने 31 धावात 2 तर
भारतीय संघात 3 बदल
मागील लढतीच्या तुलनेत भारताने येथे 3 बदल करत दिनेश कार्तिकऐवजी रिषभ पंतला संधी दिली तर अवेश खान, रविंद्र जडेजा यांच्याऐवजी हार्दिक पंडय़ा व रवि बिश्नोई यांचा समावेश केला. अवेश खान तापाने फणफणल्याने तर रविंद्र जडेजा दुखापतीमुळे खेळू शकले नाहीत.
धावफलक
भारत ः केएल राहुल झे. नवाझ, गो. शदाब खान 28 (20 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), रोहित शर्मा झे. खुशदिल, गो. हॅरिस रौफ 28 (16 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), विराट कोहली धावचीत (असिफ) 60 (44 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), सूर्यकुमार यादव झे. असिफ अली, गो. नवाझ 13 (10 चेंडूत 2 चौकार), रिषभ पंत झे. असिफ अली, गो. शदाब खान 14 (12 चेंडूत 2 चौकार), हार्दिक पंडय़ा झे. नवाझ, गो. हसनैन 0 (2 चेंडू), दीपक हुडा झे. नवाझ, गो. नसीम 16 (14 चेंडूत 2 चौकार), भुवनेश्वर कुमार नाबाद 0 (0 चेंडू), रवि बिश्नोई नाबाद 8 (2 चेंडूत 2 चौकार). अवांतर 14. एकूण 20 षटकात 7 बाद 181.
गडी बाद होण्याचा क्रम
1-54 (रोहित, 5.1), 2-62 (केएल राहुल, 6.1), 3-91 (सूर्यकुमार, 9.4), 4-126 (रिषभ, 13.5), 5-131 (पंडय़ा, 14.4),
गोलंदाजी
नसीम शाह 4-0-45-1, हसनैन 4-0-38-1, हॅरिस रौफ 4-0-38-1, मोहम्मद नवाझ 4-0-25-1, शदाब खान 4-0-31-2.
पाकिस्तान ः मोहम्मद रिझवान झे. यादव, गो. पंडय़ा 71 (51 चेंडूत 6 चौकार, 2 षटकार), बाबर आझम झे. शर्मा, गो. बिश्नोई 14 (10 चेंडूत 2 चौकार), फखर झमान झे. विराट, गो. चहल 15 (18 चेंडूत 2 चौकार), मोहम्मद नवाझ झे. हुडा, गो. कुमार 42 (20 चेंडूत 6 चौकार, 2 षटकार), खुशदिल शाह नाबाद 14 (11 चेंडूत 1 चौकार), असिफ अली पायचीत अर्शदीप 16 (8 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), इफ्तिकार अहमद नाबाद 2 (1 चेंडू). अवांतर 8. एकूण 19.5 षटकात 5 बाद 182.
गडी बाद होण्याचा क्रम
1-22 (बाबर आझम, 3.4), 2-63 (झमान, 8.4), 3-136 (नवाझ, 15.3), 4-147 (रिझवान, 16.5), 5-180 (असिफ, 19.4).
गोलंदाजी
भुवनेश्वर कुमार 4-0-40-1, अर्शदीप 3.5-0-27-1, रवि बिश्नोई 4-0-26-1, हार्दिक पंडय़ा 4-0-44-1, यजुवेंद्र चहल 4-0-43-1.
अन् ज्याच्यासाठी गेमप्लॅन नव्हता, तो नवाझ भारी पडला!
भारताने 7 बाद 181 धावा केल्यानंतर खेळपट्टीचे संथ स्वरुप पाहता, या आव्हानाचा पाठलाग करणे सोपे नव्हते. पण, रिझवानने 51 चेंडूत 71 धावा केल्यानंतर मोक्याच्या क्षणी नवाझने 20 चेंडूत 42 धावांची आतषबाजी केली आणि त्याच्यासाठी कोणताच गेमप्लॅन नसल्याचा भारताला जबरदस्त फटका बसला. खुशदिल शाह व इफ्तिकार अली या जोडीने एक चेंडू बाकी ठेवत विजय संपादन करून दिला.
चहल-हार्दिक पंडय़ाच्या 8 षटकांमध्ये 87 धावांची लयलूट
मागील रविवारी भेदक मारा साकारणाऱया यजुवेंद्र चहल (4 षटकात 1-43) व हार्दिक पंडय़ा (4 षटकात 1-44) या दोघा गोलंदाजांची येथे मात्र विशेषतः नवाझने चांगलीच धुलाई केली. चहल-पंडय़ाच्या 8 षटकात एकत्रित 87 धावांची लयलूट केल्याने पाकिस्तानला वर्चस्व गाजवणे सोपे गेले. हार्दिक पंडय़ाची शॉर्ट बॉल रणनीती निष्फळ ठरली तर चहलवर रिझवान-नवाझ यांनी चढवलेला हल्ला त्याला नामोहरम करुन गेला. षटकामागून षटकांत पाकिस्तानी फलंदाजांनी विस्फोटक फलंदाजीचा धडाका कायम लावला असताना कर्णधार रोहितच्या कपाळय़ावरील आठय़ा वाढतच गेल्या!
विराटची अलीकडील सर्वोत्तम खेळी आणि अप्रतिम सिग्नेचर रनिंग बिटविन द विकेट!
विराटने या सामन्यात अलीकडील कालावधीतील आपली एक सर्वोत्तम खेळी साकारली. कोहलीने 4 चौकार व 1 षटकार तर खेचलेच. पण, त्याही शिवाय, त्याचे सिग्नेचर रनिंग बिटविन द विकेट लक्षवेधी ठरले. त्याने एकेरीचे दुहेरी धावात केलेले रुपांतर युवा खेळाडूंसाठी उत्तम परिपाठ देणारे ठरले. रोहितचा 175, केएल राहुलचा 140 तर कोहलीचा 136 चा स्ट्राईकरेट व्यवस्थापनासाठी स्वागतार्ह असणे साहजिक होते. पण पराभवाने निराशा झाली.