रस्त्यावर सर्वत्र दलदल : दुरुस्तीकडे ग्रामपंचायतीचे पूर्णपणे दुर्लक्ष, ग्रामस्थांतून तीव्र नाराजी
वार्ताहर /सांबरा
बाळेकुंद्री खुर्द येथील मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून ग्रामस्थांना दररोज तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र रस्त्याच्या दुरुस्तीकडे ग्रामपंचायतीने पूर्णपणे दुर्लक्ष केले असल्याने ग्रामपंचायतीच्या कारभाराबद्दल ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
येथील मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडून रस्त्याची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे रस्त्यामध्ये खड्डे आहेत की खडय़ात रस्ता हरवला आहे हे ग्रामस्थांना समजेनासे झाले आहे. वास्तविक पाहता ग्रामपंचायत सदस्यांनी शासनदरबारी प्रयत्न करून रस्ता करून घेणे गरजेचे होते. मात्र ग्रामपंचायत सदस्यांकडून रस्ता करून घेण्यासाठी कोणतेच प्रयत्न होत नसल्याने दिवसेंदिवस रस्त्याची दुर्दशा होत चालली आहे. ग्रामपंचायत सदस्यांच्या उदासीनतेमुळे व ग्रामपंचायतमधील अंतर्गत गटबाजीमुळे गावचा विकास खुंटला आहे.
निदान तात्पुरत्या डागडुजीची गरज
नवीन ग्रामपंचायत अस्तित्त्वात येऊन दीड वर्षाचा कालावधी होत आला आहे. तरी गावातील एकही ठोस काम झालेले नाही. त्यामुळे ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सध्या मुख्य रस्त्याची झालेली अवस्था पाहता ग्रामपंचायतीने निदान तात्पुरती डागडुजी करणे तरी गरजेचे होते. मात्र ग्रामपंचायतीकडून कोणतीच कार्यवाही होत नसल्याने ग्रामपंचायत काय केवळ शोभेची वस्तू आहे की काय, असाही प्रश्न ग्रामस्थांतून उपस्थित करण्यात येत आहे. तसेच जलजीवन मिशन या योजनेअंतर्गत मुख्य रस्त्यावर पाईप लाईन घालण्यासाठी ऐन पावसाळय़ातच खोदाई करण्यात आली. त्यामुळे गैरसोयीत आणखीन भर पडली आहे. विद्यार्थ्यांना व नागरिकांना दररोज चिखलातूनच वाट शोधण्याची वेळ आली आहे. त्यामुळे गावच्या मुख्य रस्त्याला कोण वाली आहे की नाही, असा संतप्त सवाल ग्रामस्थांतून विचारण्यात येत आहे.