रुंदीकरण केलेल्या रस्त्यांचा वापर जुन्या वाहनांच्या पार्किंगसाठी : मनपा याकडे लक्ष देईल का?
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक केंडीची समस्या भेडसावत आहे. या समस्येचे निवारण करण्यासाठी विविध रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले. चव्हाट गल्ली ते दरबार गल्ली दरम्यानच्या रुंदीकरण करण्यात आलेल्या रस्त्याचा वापर केवळ पार्किंगसाठी होत आहे. काही जुन्या वाहनांसह नवीन वाहने या ठिकाणी कायमस्वरुपी पार्क करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रस्त्यांचे रुंदीकरण पार्किंगकरिता का? असा मुद्दा उपस्थित केला जात आहे.
शहरातील रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढली आहे. प्रत्येक रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अस्ताव्यस्तपणे वाहने लावण्यात आल्याने वाहतूक कोंडी होऊन वाहनधारकांना तासन्तास अडकून पडावे लागते. बाजारपेठेसह मुख्य रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागत असतात. त्यामुळे महापालिकेने रहदारी समस्येवर तोडगा काढण्यासाठी काही रस्त्यांचे रुंदीकरण केले आहे.
रामलिंगखिंड गल्ली, कडोलकर गल्ली, पांगुळ गल्ली, चव्हाट गल्ली, दरबार गल्ली, खासबाग संभाजी रोड आदींसह विविध रस्त्यांवरील मालमत्ता आणि अतिक्रमणे हटवून रस्त्यांचे रुंदीकरण केले होते. मात्र, हे सर्वच रस्ते आता वाहनतळ बनू पाहत आहेत. रामलिंगखिंड गल्ली येथील रस्त्यावर दुतर्फा दुचाकी आणि चार चाकी वाहने पार्क करण्यात येत असल्यामुळे रुंदीकरण केलेल्या रस्त्याला पार्किंग तळाचे स्वरुप आले आहे. रस्त्याच्या रुंदीकरणाचा उद्देश काय? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. दुतर्फा वाहने पार्क केली जात असल्याने मूळ रस्त्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यामुळे रुंदीकरण करून काय साध्य झाले? अशी विचारणा नागरिक करीत आहेत.
वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांना अडचण
चव्हाट गल्ली मराठी शाळेपासून पिंपळकट्टा चौकापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले होते. दरबार गल्ली तसेच मुजावर गल्ली परिसरातील इमारती हटवून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. मात्र, चव्हाट गल्ली शाळेसमोर आता वाहनतळ निर्माण झाला आहे. या ठिकाणी वापरात नसलेली जुनी वाहने आणि नवीन वाहनेही कायमस्वरुपी पार्क करण्यात येत आहेत. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण वाहने पार्क करण्यासाठी करण्यात आले का, अशी विचारणा नागरिक करीत आहेत.
या ठिकाणी पार्क करण्यात आलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. दोन्ही बाजूला खासगी आणि सरकारी शाळा असून वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. महापालिका याकडे लक्ष देईल का, अशी विचारणा होत आहे.