न्यायालयाने स्थगिती देऊनही काम सुरूच : जिल्हा प्रशासन-राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या भूमिकेमुळे शेतकरी अडचणीत
प्रतिनिधी / बेळगाव
हलगा-मच्छे बायपास रस्त्याला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. असे असताना हे काम सुरूच ठेवण्यात आले आहे. याबाबत न्यायालयाने कारणे दाखवा नोटीसही बजावली. तरीदेखील काम सुरू असल्याने शेतकऱयांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आता अलारवाड क्रॉसकडूनही या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे शेतकऱयांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम गेल्या 10 ते 12 वर्षांपासून सुरू करण्याचा प्रयत्न झाला होता. त्याला शेतकऱयांनी तीव्र विरोध केला आहे. अनेकवेळा हा रस्ता करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी न्यायालयात धाव घेतल्यामुळे न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यानंतर पुन्हा हलगा-मच्छे बायपासकडून युद्धपातळीवर हे काम सुरू करण्यात आले. उभ्या पिकांवर जेसीबी फिरवून कामाला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे एका शेतकऱयाच्या मुलाने आत्महत्या करण्याचा प्रयत्नदेखील केला होता.
त्यानंतर न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यामुळे ते काम बंद करण्यात आले होते. मात्र उच्च न्यायालयात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वकिलांनी चुकीची माहिती दिली होती. त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या सूचनेनुसार काम सुरू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र वस्तुस्थिती वेगळीच आहे. आता अलारवाड क्रॉसकडून जोरदार कामाला सुरुवात करण्यात आले आहे. मच्छेकडून येळ्ळूर रस्त्यापर्यंत काम सुरू असून माती टाकण्याचे काम केले जात आहे.
काही दिवसांत
रस्ता पूर्ण करण्याची तयारी आता अलारवाड क्रॉसजवळ पुलाची उभारणी करण्यासाठी लोखंडी बार उभे करण्यात आले आहेत. याचबरोबर रस्त्यावर मातीदेखील टाकण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हा रस्ता पूर्ण करण्याच्या तयारीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या या भूमिकेमुळे शेतकरी मात्र अडचणीत आला असून न्याय कोणाकडे मागायचा? असा प्रश्न शेतकऱयांना पडला आहे.