निवेदन देऊनही बेदखल : संबंधित खात्याने त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
उद्यमबाग येथील औद्योगिक वसाहतीत अनेक वर्षांपासून रस्ते न झाल्याने नागरिकांना खड्डय़ातून वाट काढावी लागत आहे. बेळगाव शहर व परिसरात उद्यमबाग, अनगोळ, मच्छे, नावगे, बामणवाडी, वाघवडे, काकती, होनगा आदी आठ औद्योगिक वसाहती आहेत. यातील सर्वच वसाहतीतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या भागात औद्योगिक क्षेत्राला लागणारा कच्चा माल व तयार झालेल्या मालाची उचल करण्यासाठी ट्रक, ट्रक्टर, रिक्षा यांचा मोठय़ा प्रमाणात वापर होतो. मात्र रस्ते खड्डेमय झाल्यामुळे वाहतूक करण्यासाठी बराच अडथळा निर्माण होत आहे. मशीन शॉपमधून निघणारे किस वाहतूक करताना रस्त्यावर पडल्यामुळे वाहने पंक्चर होणे व नादुरुस्त होणे असे प्रकार सर्रास घडत आहेत. यामुळे डिझेलच्या खर्चासह दुरुस्ती खर्चाचा भुर्दंडही वाहनधारकांवर पडत आहे. तिसऱया गेटपासून ते पिरनवाडीपर्यंतचा केवळ महामार्ग चांगला आहे. मात्र अंतर्गत असणारे रस्ते खड्डेमय आहेत. या रस्त्यावर वाहतूक करणे फार जिकिरीचे झाले आहे. पावसाळय़ात चिखलाचे साम्राज्य तर उन्हाळय़ात धुळीमुळे उद्योजक व कामगार हैराण होतात. दरवषी पावसाळय़ात मोठय़ा प्रमाणात समस्या निर्माण होत असून अनेक ठिकाणी पाण्याची डबकी तयार झाली आहेत. त्या पाण्यातून वाट काढणेही कठीण बनते.
सध्या उद्यमबाग येथील औद्योगिक वसाहतीतील अनेक रस्ते खराब झाले आहेत. यापूर्वी काही रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. पण ती केवळ पश्चिम भागात झाली आहे. पूर्व भागातील रस्ते अत्यंत खराब झाले आहेत.
पावसाळय़ानंतर रस्ता दुरुस्त करावा उद्यमबाग औद्योगिक वसाहतीत मोठमोठे उद्योगधंदे आहेत. यामध्ये विमान वाहतुकीसाठी पुरणारे पार्ट्स, ऑटोमोबाईल, लिफ्ट वॉल्स, मशीन टूल्स इत्यादी लागणारे पार्ट तयार करण्याचे कारखाने आहेत. निर्यातीमध्येसुद्धा बेळगावचा चांगला सहभाग आहे. असे असतानादेखील रस्ते, गटारी, पाण्याची सोय, वीज, रात्री गस्तीची सोय, पोलिसांची गस्तीची सोय इत्यादींकडे दुर्लक्ष होत आहे. याबाबत वेळोवेळी उद्योजकांकडून संबंधित सरकारी अधिकाऱयांना निवेदन देण्यात आले आहे. पावसाळा संपल्यानंतर कायमस्वरुपी रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी उद्योजक व कामगारांतून केली जात आहे.